Stray Dogs in Kalyan – कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा, गोविंदवाडी परिसर, वल्लीपीर रस्ता आणि परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये भटक्या श्वानांनी एकूण ६७ जणांना शनिवारी दिवसभरात चावा घेतल्याची घटना घडली आहे. काही घटना या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेकडून पालिका हद्दीतील भटके श्वान यापूर्वीप्रमाणे निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून उचलले जात नाहीत. तक्रार केली तरी त्याची दखल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी कल्याणमध्ये एकाच दिवशी ६७ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनेची कबुली दिली आहे. पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काही लहान मुलांनाही भटक्या श्वानांनी चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत शहकाटशहाच्या राजकारणात हा विभाग अडकला आहे. त्यामुळे रुग्ण सेवा, भटक्या श्वानांचा बंदोबस्त या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नसल्याचे पालिकेत चित्र आहे. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे असे नागरिक सांगतात.
भटका श्वान चावलेल्या मोहसिन सय्यद यांनी सांगितले, मी दुपारचे घरात भोजन केले. इमारतीखाली येऊन दुचाकी सुरू करून निघण्याच्या प्रयत्नात होतो. तितक्यात वेगाने एक भटका श्वान माझ्या अंगावर आला. त्याला हुसकावत असतानाच त्याने जोराने माझ्या पायाला चावा घेतला. मी मोठ्याने ओरडायला लागलो. तेव्हा भटका श्वान तेथून पळून गेला. त्यानंतर या भटक्या श्वानाने कोळीवाडा भागातील चार ते पाच जणांना चावा घेतला आहे. यामध्ये एका महिलेचा, एका लहान मुलाचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्ता भागात भटक्या श्वानाने एकाच भागात पाच जणांना चावा घेतला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे.
कल्याण शहरात अनेक शाळा आहेत. लहान मुले आपल्या पालकांसोबत पायी शाळत येजा करतात. श्वान चावण्याच्या या घटनांमुुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घर परिसरात एखादे लहान मूल खेळत असेल आणि अचानक भटक्या श्वानांनी त्या बालकावर हल्ला केला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे कोळीवाडा भागातील रहिवासी इम्रान सय्यद यांनी सांगितले.
यापूर्वी आयुक्तांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी दर महिन्याला शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बिजीकरण, नसबंदी करण्याची कामे करत होते. पण आता निर्बिजीकरण केंद्राचे काम पाहणाऱ्या नियंत्रक अधिकाऱ्याचे पत्रीपुलाजवळील निर्बिजकरण केंद्राकडे लक्ष नाही. शहरात भटके श्वान पकडण्याची मोहीम पालिकेकडून राबविली जात नाही. त्यामुळे हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत, असे नागरिक सांगतात.
कल्याणमध्ये दिवसभरात ६७ जणांना भटका श्वान चावल्याच्या घटना घडल्या आहेत. भटक्या श्वानांचे नियमित निर्बिजीकरण, नसंबदी, ॲन्टी रेबिज केले जाते. दरमहा सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांना भटके श्वान चावतात. भटक्या श्वानांसाठी आणखी एक केंद्र सुरू करण्याचा प्रशासन विचार करत आहे. – डाॅ. दीपा शुक्ल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.