उल्हासनगरः गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे वादात असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांच्यावर कामात अनियमितता दाखवल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी यात मंडळाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे चोरीच्या प्रयत्नाच्या प्रकरणाआधी महापालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती. त्यामुळे या निलंबनाला वेगळ्या अर्थाने पाहिले जाते आहे. उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार पालिका मुख्यालयापासून दूर कॅम्प दोन भागात चालतो. पालिका मुख्यालयापासून दूर असल्याने या शिक्षण विभागाच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. येथे चालणारा कारभार, येथील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती त्यातील त्रुटी अशा अनेक बाबींवर अनेक जणांनी आपले आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे या विभागाच्या तक्रारीही अनेक असतात. काही दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी शिक्षण विभागातील १२ वर्षांच्या कारभाराचे विशेष लेखा परिक्षण करण्याची विनंती स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाच्या संचालकांना केली होती. हेही वाचा >>> महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची गुरुवारी डोंबिवलीत बैठक या चौकशीच्या मागणीला काही दिवस उलटत नाही तोच या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या शिक्षण विभागात नक्की चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत होता. लेखा परिक्षणाची सुरूवात आणि चोरीचा प्रयत्न या दोन घटनांना एकत्र जोडून पाहिले जात होते. हे सुरू असतानाच आता शिक्षण विभागाचे अधिक्षक आणि प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केली असल्याचे बोलले जाते. शहरात या निलंबनाच्या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पालिकेच्या कोणत्या विभागात दर्जेदार काम होत आहे, असा सवालही काही नागरिक उपस्थित करत आहेत. हेही वाचा >>> ठाणे : एसटी चालकास मारहाण नक्की झाले काय शिक्षण मंडळाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी १३ जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांनी एक बैठक आयोजित केली होती. मात्र शिक्षण विभागाच्या अधिकक्षकांनी पूर्वसूचना देऊनही बैठकीची तयारी केली नाही. त्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचा आढावा घेतला असता नियोजनशून्य कारभाराची त्यांना प्रचिती आली. बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, शालेय साहित्य, गणवेश, पोषण आहार, शाळांना भेटी देणे तसेच शाळांच्या कारभारावर नियंत्रण आणि इतर कामांचे नियोजनाबाबत प्रशासनाधिकारी निरूत्साही असल्याचा ठपका. निधी वापरण्याबाबत नसलेले नियोजन, समाधानकारक उत्तर न देणे अशा गोष्टींमुळे ही कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे.