अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पश्चिमेच्या वुलन चाळ भागातून ९ मास विक्री दुकानांमधून सुमारे १ हजार ४५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी वुलन चाळ येथे जात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर ७ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमास विक्री केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
गोमास विक्रीला कायद्याने बंदी आहे. असे असतानाही या गोमासाची विक्री आणि वाहतूक केली जात असल्याचे गेल्या काही दिवसातल्या घटनांमधून समोर आले आहे. काही दिवसांपासून बदलापूर शहरातून मुंब्रा येथे गोमास घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तिला मध्य रेल्वेत सहप्रवाशांनी पकडून दिले होते. त्याच्यावर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरामुळे बदलापुरसारख्या शहरात गोमास विक्री उघडपणे होत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच अंबरनाथ शहरात पोलिसांनी तब्बल १ हजार ४५० किलो गोमांस जप्त केले आहे. अंबरनाथ पश्चिमेतील वुलन चाळ परिसरात काही दुकानांत गोमास विक्री केली जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार त्यांनी वुलन चाळ परिसरात छापा मारला. यावेळी ९ दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर गोमास जप्त करण्यात आले. यावेळी पोलिसांनी संबंधित माल विक्रेत्यांकडे या गोमासाबद्दल चौकशी केली. त्यावेळी विक्रेते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तर गोमासाच्या खरेदी विक्रीच्या पावत्याही ते सादर करून शकले नाही. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी पशू डॉक्टरांना पाचारण केले.
खातरजमा केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पशु संरक्षण कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात १३ आरोपींचा समावेश असल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली आहे. यातील ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त केलेल्या गोमासाचे नमुने बाजूला काढून इतर गोमासाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
या प्रकारानंतर खुल्या पद्धतीने गोमासाची विक्री अंबरनाथमध्ये होत असल्याचे उघड झाले आहे. कायद्यानुसार बंदी असतानाही अशी विक्री केली जात असल्याने याबाबत सातत्याने कारवाई व्हावी, अशी मागणी होते आहे.