ठाणे : जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात तात्पुरत्या स्वरूपाची पुरपरिस्थिती निदर्शनास आली. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, विस्तृत उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागावर विशेष भर देण्यात आला आहे.
ठाणे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुरस्थितीवर दैनंदिन नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे पंचायत स्तरावरील तालुकास्तरीय कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्ष आणि जिल्हा परिषद ठाणे येथील साथरोग नियंत्रण कक्षा सोबत नियमित संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गावांमध्ये आरोग्य पथक देखील तैनात करण्यात आले आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात २ महिला आणि २ पुरुष कर्मचारी आणि कमी लोकसंख्या असलेल्या गावात १ महिला आणि १ पुरुष कर्मचारी सेवा देणार आहेत. या पथकांकडे औषधसाठा आणि तपासणीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध केली जाणार आहे.
पुर परिस्थितीच्या काळात साथीचे आजार उद्भवू नये म्हणून आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच पुरपरिस्थितीमुळे घर सोडलेल्या नागरिकांसाठी शाळा/ देवालये /मंगल कार्यालयांमध्ये वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी आणि औषधोपचार द्यावे यासारख्या विविध उपाययोजना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धपणे राबविण्यात येत असून, पुरपरिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.