ठाणे : मुंबई, ठाणे आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीची कामे सुरू आहेत. या कामादरम्यान, सेवा रस्त्यांच्याकडे मोठ्या गटारांची बांधणी करून त्यावर पदपथ उभारणीची कामे सुरू असली तरी, पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नागरिक याच पदपथावरून प्रवास करीत आहेत. त्याचबरोबर सेवा रस्ते नसल्यामुळे अनेकजण याच पदपथावरून दुचाकीने वाहतूक करीत आहेत. मात्र, या गटारांच्या चेंबरवर अनेक ठिकाणी झाकणेच नसल्यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
उरण येथील जेएनपीटी बंदर आणि गुजरात अशी अवजड वाहतूक सुरू असते. ही वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. या वाहनांना रात्री आणि दुपारच्या वेळेत वाहतूकीस परवानगी आहे. याशिवाय, घोडबंदर परिसरातील नागरिकांची वाहने याच मार्गे वाहतूक करतात. या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत होती. ही कोंडी कमी करण्यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणीचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आणि त्याचे कामही काही महिन्यांपुर्वी सुरू केले. मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या मधोमध यापुर्वी गटारे होती. मात्र, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामात ही गटारे बाधित होणार आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यांच्या कडेला नव्याने गटार बांधणीची कामे सुरू आहेत. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खणून मोठ्या गटारांची बांधणी करण्यात येत आहे. कापुरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूला उभाण्यात येत असलेल्या गटारांवर नागरीकांना चालण्यासाठी पदपथ तयार करण्यात येत आहे. ही कामे अद्याप पुर्ण झालेली नाहीत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नसल्यामुळे नागरिक निर्माणधीन पदपथावरून प्रवास करीत आहेत. निर्माणधीन पदपथावर झाकणे बसविण्यात आलेली होती. मात्र, अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली असून काही ठिकाणी झाकणे बसविण्यात आलेली नाहीत. त्यातच मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामासाठी या मार्गावर काही ठिकाणी विद्युत दिवे बंद करण्यात आले असून रात्रीच्या वेळेत अंधारातून नागरिक प्रवास करीत असून या दरम्यान उघड्या चेंबरमध्ये पडून अपघात होण्याची भिती व्यक्त आहे.
दुचाकीस्वारांचा धोकादायक प्रवास
कापुरबावडी ते गायमुखपर्यंतच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्त्यांवर गटार बांधणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या मधोमध असलेली गटारे तोडण्यात येत आहेत. तर, काही ठिकाणी रस्ता जोडणीसाठी रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे सेवा रस्ते वाहतूकीसाठी उपलब्ध होत नसून अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक करतात. यामुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे. तर, काही दुचाकीस्वार निर्माणधीन पदपथावरून दुचाकीने वाहतूक करतात. आनंदनगर, वाघबीळ या पट्ट्यात हे चित्र दिसून येते. मात्र, इथे गटारांवर काही ठिकाणी झाकणे नसल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.