ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुंब्रा येथील शीळ भागातील १७ बेकायदा इमारतींच्या बांधकामावर कारवाईची नामुष्की ओढावलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेऊन त्यात शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी नऊ प्रभाग समितीनिहाय पथके नेमण्याच्या सुचना देत रहिवास व्याप्त असलेल्या बेकायदा इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याच्या तक्रारीही यापुर्वी पुढे आल्या होत्या. मागील अडीच-तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही बांधकामे सुसाट पद्धतीने उभी राहू लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथील शीळ भागातील १७ बेकायदा इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी देत असताना उच्च न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या इमारतींची पहाणी करावी आणि अहवाल सादर करावा असा आदेश दिले होते. या आदेशानंतर आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची नामुष्की ओढावली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील बेकायदा बांधकामांचा मुद्दाही ऐरणीवर आला असून यावरून पालिकेवर टिका होऊ लागताच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात एक महत्वाची बैठक घेतली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि सहाय्यक आयुक्तांनी ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करावे आणि या सर्वेक्षणानंतर त्याठिकाणी असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले. त्याचबरोबर शहरातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत एक पथक नेमण्यात आलेले असून या पथकांच्या संख्येत आवश्यकता भासल्यास वाढ करावी. या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने गुरवारपासून शहरातील इतर बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. काही वेळेस बेकायदा इमारतींची बांधकामे वाचविण्यासाठी काही मजल्यांपर्यंत त्या रहिवास व्याप्त केल्या जातात. परंतु अशा इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. या वृत्तास ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दुजोरा दिला आहे.
मुंब्रा येथील शीळ भागातील १७ पैकी १२ इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ५ इमारतींमधील रहिवाशांनी स्वताहून घरे रिकामी करावीत, अशा नोटीसा पालिकेने बजावल्या आहेत. त्या खाली केल्या नाहीतर पालिका स्वत: कारवाई करणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.