ठाणे : यंदा ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला २५० कोटी रुपयांच्या देयक वसुलीचे उदीष्ट ठरवून देण्यात आले असून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आतापर्यंत तब्बल ४३ कोटी ५९ लाख रुपयांची वसुली केली आहे, त्याचे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे १८ टक्के इतके आहे. पाणी देयकांचे उदीष्ट पुर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेने पाणी देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, यात थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पालिकेने दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला २५० कोटी रुपयांच्या देयक वसुलीचे उदीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी, ९२ कोटी २८ लाख रुपये थकबाकीपोटीचे आहेत. तर, चालू वर्षाची देयकाची रक्कम ही १५७ कोटी ८० लाख रुपये आहे. पाणी देयकाची वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली असून यात थकबाकी भरत नसलेल्या नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने २०२४-२५ या वर्षात पाणी देयकांपोटी १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले होते. ही वसुली २०२३-२४ च्या तुलनेत १५ कोटी रुपयांनी अधिक होती. या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू देयकांची १०० टक्के वसुली करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

तर गुन्हा दाखल करणार

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनात पाणी देयक वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. या वसुलीच्या मोहिमेचा आढावा पाणी पुरवठा विभागातर्फे दर सोमवारी घेतला जाणार आहे. त्यात अहवाल सादर केला नाहीतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात, मंगळवारी सायंकाळी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक झाली.

उपनगर अभियंता विनोद पवार यांनी या बैठकीत वसुलीची स्थिती आणि कारवाईचे स्वरुप याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीस सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मीटर रिडर आदी उपस्थित होते. पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी देयकाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

प्रभागवसुली
नौपाडा – कोपरी६,५४,०८,६६०
उथळसर३,९३,७३,३६९
माजिवडा-मानपाडा७,६०,८८,४३५
वर्तकनगर४,६४,८०,४००
कळवा३,२५,८२,९८३
वागळे२,२४,०२,८४०
लोकमान्य- सावरकर३,५९,११,७२५
मुंब्रा४,१३,६६,९८५
दिवा४,२०,००,४५६
मुख्यालय-सीएफसी३,४३,०६,७३०
एकूण४३,५९,२२,५८३