बदलापूरः भटक्या श्वानांची संथगतीने सुरू असलेली निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिम आणि त्याचवेळी वेगाने वाढणारी भटक्या श्वानांची संख्या यामुळे बदलापुरच्या रस्त्यांवर, चौकात, सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांची दहशत कायम आहे. बदलापूर शहरात वाढलेल्या या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. रस्ते, उद्यान, चौक या श्वानांनी व्यापले आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

आठवडाभरापूर्वी बदलापूर शहरात एका नऊ वर्षीय मुलीचा भटक्या श्वानाने चावा घेतल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला. शहरात आजही भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शहरातील महत्वाचे रस्ते, चौक, अंतर्गत रस्ते, गृहसंकुले, उद्याने या सर्व ठिकाणी भटक्या श्वान मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे पहाटे लवकर घराबाहेर पडणारे नोकरदार, फेरफटा मारण्यासाठी सकाळी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. रात्री उशिराही याच भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते आहे.

बदलापूर पूर्व, पश्चिम अशा दोन्ही भागातील नाले, उघड्यावर कचरा टाकला जाणारी ठिकाणे, चायनीज आणि मास, मच्छी विक्रेत्यांची दुकानांच्या भोवती भटक्या श्वानांची गुजरान होते. या ठिकाणी भटके श्वान पोसले जातात. त्यामुळे अशा ठिकाणांवर लक्ष्य केंद्रीत करण्याची मागणी होते. आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या वर्षापर्यंत श्वान निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहिम पूर्णपणे ठप्प होती. जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा नव्या संस्थेला काम देण्यात आले. मात्र पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने श्वान निर्बिजीकरण मोहिम संथगतीने सुरू होती.

निर्बिजीकरणाचा वेग वाढणार

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या श्रेया शिरवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रतापराव राणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणाचे काम केले जाते आहे. पूर्वी फक्त ३९ पिंजरे उपलब्ध होते. आता पिंजऱ्यांची संख्या ६५ पर्यंत गेली आहे. पायाभूत सुविधा वाढल्याने येत्या काळात निर्बीजीकरण आणि लसीकरण वाढेल, अशीही आशा त्यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली आहे. महिन्याला ४५० पर्यंत निर्बिजीकरण आणि लसीकरण केले जाणार आहे.
नागरिकांनो करा तक्रार

शहरात भटके श्वान दिसताच त्याची माहिती पालिका प्रशासनाला कळवावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ७८८७८९१२०२ या क्रमांकावर भटक्या श्वानांची तक्रार द्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्बिजीकरणाच्या मर्यादा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याची तक्रार येत असतानाच या निर्बिजीकरण आणि लसीकरण प्रक्रियेत मर्यादा आहेत. गरोदर भटके श्वानांचे निर्बिजीकरण आणि लहान पिलांचे लसीकरण करता येत नाही. त्यामुळे या काळात त्यांची संख्या वाढत असते असेही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.