कल्याण: कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी लगतच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गोपालकांची कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ विभागाचे आपत्कालीन पथक, महसूल विभागाचे अधिकारी, टिटवाळा पोलीस आणि स्थानिक सराईत नावेकरी ग्रामस्थांच्या प्रयत्नाने सोमवारी दुपारी सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.
कल्याण तालुक्यातील मोहिली गावातील तीन गोपालक सावल्या वाघे (६५), शंकर पाटील (५५), देव गायकर (६०) सोमवारी सकाळी आपल्या दुभत्या म्हशी उल्हास नदी काठच्या माळरानावर चरायला घेऊन गेले होते. रानभाज्यांसाठी ते जंंगलात फिरणार होते. उल्हास नदीचे पाणी अचानक वाढेल आणि आपण त्यात अडकून पडू असे या तिन्ही गोपालकांना वाटले नाही. उल्हास नदी पात्रातील पाणी हळूहळू वाढू लागले. पाण्याची पातळी वाढत गेली तरी ते आपल्यापर्यंत पोहचेल असेही या गोपालकांना वाटले नाही.
गोपालकांना म्हशी घरी घेऊन जाण्याचा रस्ता हा नदी काठाजवळून होता. नदीच्या पाण्याची पातळी वाढत जाऊन हे तिन्ही गोपालक एका माळरानावर अडकले. गोपालकांच्या म्हशी पाणी पातळी वाढताच पाण्यात सूर मारून सुरक्षितपणे बाहेर आल्या. नदीच्या पाण्याची पातळी वाढून आपण पुराच्या पाण्यात अडकलो असल्याची जाणीव झाल्यावर या तिन्ही गोपालकांनी बचावासाठी धावा केला. नदीने रौद्ररूप धारण केल्याने कोणीही पादचारी, स्थानिक नदी पात्रात उतरून या गोपालकांच्या बचावासाठी पुढे येत नव्हता. ही माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळताच त्यांनी महसूल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाला तिन्ही गोपालकांची पुरच्या पाण्यातून सुटका करण्याचे आदेश दिले.
अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, मंडळ आणि ग्राम महसूल अधिकारी, पालिका अग्निशमन आणि आप्तकालीन पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. नदीत सराईतपणे न्हाव (बोट) वल्हवणारे गाळेगावातील ग्रामस्थ गुरुनाथ पवार (४०), रोहन पवार (२१) यांना न्हावेसह पाचारण करण्यात आले. नदी पात्राची माहिती असल्याने अग्निशमन जवान यांच्या साथीने गुरूनाथ, रोहन यांनी पुराच्या पाण्यात न्हाव चालवून ते तिन्ही गोपालकांच्या ठिकाणी पोहचले. या गोपालकांना नावेकऱ्यांनी बोटीत घेतले. तेथून त्यांना नदी काठच्या सुरक्षित ठिकाणी आणून उतरविले.
कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडला नसल्याने असा काही उल्हास नदीला पूर येईल असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो, असे गोपालकांनी सांगितले. सकाळपासून पुराच्या वेढ्यात अडकून पडलेल्या या तिन्ही गोपालकांची प्रकृती ठणठणीत असल्याची खात्री पटल्यावर त्यांना बंदिस्त भोजनाची पुडकी पालिकेकडून देण्यात आली.
मोहिली गावातील तीन गोपालक उल्हास नदी पात्राजवळ म्हशी चरण्यासाठी घेऊन गेले होते. अचानक नदीचे पाणी वाढल्याने ते पात्रातील एका माळरानावर अडकले. त्यांची पालिका, पोलीस, महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटका करण्यात आली. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग.