ठाणे : घोडबंदर मार्गावरील अपघात टाळण्यासाठी येथील सिग्नलजवळील चौकातील रस्त्यावर वेग नियंत्रक पट्ट्या (रम्बलर) बसविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर या पट्ट्या बसविल्या जाणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलच्या चौकातील रस्त्यावर त्यांची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांसदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधी उपस्थित होते. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांसह इतर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या वाहनांच्या वेगामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हाच मुद्दा मांडत अपघात टाळण्यासाठी सिग्नलजवळील चौकातील रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. त्यावर प्रायोगिक तत्वावर सिग्नलजवळील चौकातील रस्त्यावर वेग नियंत्रक पट्ट्या (रम्बलर) बसविण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी. तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स अशा गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड काँग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत, वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था, रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट असे विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर, कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच, रस्त्यावरील राडारोडा, विद्युत वाहिन्या, अनावश्यक मार्गरोधक काढून टाकरण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.
लोकसहभागाची आवश्यकता
गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवला आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
रिक्षा थांब्यासाठी संयुक्त सर्वेक्षण
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचे या बैठकीत ठरले. रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्यांचे नियमन करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सांगितले.