शहापूर : शहापूर तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील व्यापारी संतापले आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येत शनिवारी महावितरण कार्यालयाला भेट दिली. महावितरण विभागाकडून दुरुस्तीचे काम केल्यानंतरही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून हा वीज पुरवठा सुरळित करावा अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेत, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी आणि लघु उद्योजक त्रस्त झाले आहेत. महावितरण विभागाकडून वारंवार दुरुस्तीचे काम केले जात असतानाही वीज पुरवठा दहा तासाहून अधिक वेळ खंडीत होतो. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
यावेळी शहापूर तालुक्यातील रामबाग येथे व्यावसायिक जोडणीसाठी स्वतंत्र रोहित्र बसवणे, शहरातील अन्य रोहित्र वरील अनावश्यक जादा भार कमी करणे, ब्राह्मण आळी, खालचा नाका, सावंत विहार, माने नगर तसेच पंडित नाका येथे नव्याने जादा रोहित्र बसविण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसात उपाययोजना आणि आवश्यक दुरुस्ती करून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमित करणे, अपुरा कर्मचारी वर्ग तातडीने भरणे, दुरुस्तीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करणे असे विविध निर्णय महावितरणचे उप विभागीय अभियंता यादव इंगळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष गौरी अग्रवाल, किशोर गुजराथी, किशोर अग्रवाल, यशवंत गुजरे, विशाल मडके, योगेश शहा, जयवंत जोशी यांसह महावितरणचे शहापूर शहर अभियंता आदित्य जोशी उपस्थित होते.