डोंबिवली – येथील पूर्वेतील दत्तनगरमध्ये अनेक वर्षापासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दररोज मासळी बाजार भरतो. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढल्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत दत्तनगर मासळी भागात दररोज वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे पादचारी, प्रवासी हैराण आहेत.

मासळी बाजारात मासळी विक्रेत्यांचे मंच पदपथाला खेटून मुख्य रस्त्यावर चार ते पाच फूट परिसरात लावलेले असतात. चाळीस ते पन्नास मासळी विक्रेते दत्तनगर भागात रस्त्याच्या दुतर्फा बसलेले असतात. डोंबिवली पश्चिमेत जाणारी बहुतांशी वाहने याच रस्त्याने धावतात. त्यांना दत्तनगर भागात मासळी बाजाराचा फटका बसतो. टंडन रस्ता, दत्तनगर रस्ता ३० फुटाचा आहे. या रस्त्याचा बहुतांशी भाग मासळी विक्रेत्यांनी व्यापलेला असतो.

या मासळी बाजारामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून सहा वर्षापूर्वी दत्तनगर मधील मासळी बाजार बाजुला असलेल्या मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा ठराव कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेने केला आहे. त्याची नंतर अंमलबजावणी झालेली नाही. या मासळी बाजाराचा अलीकडे शालेय बस, मालवाहतूक अवजड वाहने यांना सर्वाधिक फटका बसतो. ही वाहने या भागातून जात असताना मासळी बाजाराच्या दुतर्फा बसलेल्या मंचकांचा त्यांना अडथळा येतो. आपल्यामुळे वाहनांना अडथळा होतो याचाही विचार याठिकाणी केला जात नाही. मासळी बाजारात वाहतूक कोंडी की वाहनांचा रांगा संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय, कोपर पूल दिशेने लागतात.

या दररोजच्या कोंडीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. दत्तनगर प्रभागाचे माजी नगरसेवक आमदार राजेश मोरे होते. त्यांच्या कार्यकाळात मासळी बाजार स्थलांतराचा ठराव पालिकेकडून मंजूर झाला आहे. आमदार मोरे यांनी पुढाकार घेऊन दत्तनगर मधील मासळी बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडीचा विचार करून हा मासळी बाजार याच भागातील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक, प्रवाशांकडून केली जात आहे.

या मासळी बाजाराला खेटून भाजीपाला विक्रेते बसतात. त्यामुळे या भागातील कोंडीत आणखी भर पडते. डोंबिवली शहरात अनेक भागात सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहन चालक पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातात. त्याचाही भार दत्तनगर रस्त्यावर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दत्तनगरमधील मासळी विक्रेते स्वताहून बाजुच्या मोकळ्या जागेत जाण्यासाठी तयार आहेत. दत्तनगर मधील वाहतूक कोंडीचा विचार करून हा मासळी बाजार बाजुच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने आपण पालिका प्रशासनाबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ.- राजेश मोरे आमदार, कल्याण ग्रामीण.