ठाणे महापालिका क्षेत्रात पाच दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या पावसानंतर वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या २४ तासात २ वृक्ष पडली तर २ ठिकाणी फांद्या पडल्या. या घटनेत कोणतीही हानी झालेली नसली तरी यानिमित्ताने शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. तसेच अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे.
१०६ वृक्ष धोकादायक
ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. त्यापैकी सुकलेल्या अवस्थेत असलेली ८० वृक्ष काढून टाकली होती. उर्वरित वृक्ष काढून टाकण्याची कामे सुरू होती. असे असतानाही पाच दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या पावसानंतर शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरू झालेले आहे.
नागरिकांच्या जीव धोक्यात
पाऊस थांबला असला तरी वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र अद्याप थांबलेले नाही. रस्त्यालगतचे वृक्ष उन्मळून पडण्याचे किंवा फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. रस्त्यावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.