संमेलन आयोजकांपुढील प्रश्न : पालकमंत्री, राज्यमंत्री की महापौर?; आर्थिक रसद पुरवण्याच्या निकषावर निवड होण्याची शक्यता डोंबिवलीमध्ये होऊ घातलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीचा बार अद्याप उडणे बाकी असतानाच या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत राजकीय वर्चस्व असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्येच यावरून नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वागताध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तर भाजपतर्फे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव या पदासाठी सध्या आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे महापौर राजेंद्र देवळेकर आणि आगरी युथ फोरमचे गुलाब वझे हेसुद्धा या पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. साहित्य संमेलनासाठी मोठी आर्थिक उलाढाल आणि मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने पालकमंत्र्यांना खूश करावे की राज्यमंत्र्यांना यामध्ये समितीमध्ये संभ्रमावस्था आहे. ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होत असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी चार नावांची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर असून त्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हेही यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र याविषयी उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही. साहित्य संमेलनासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधी आणि मनुष्यबळही लागणार आहे. दीड ते दोन कोटींच्या घरात हा खर्च जाण्याची शक्यता असल्याने त्याची तजवीज करू शकणाऱ्या बडय़ा राजकीय प्रस्थाची या पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या तरी या पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र शिंदे यांना हे पद दिले तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे नाराज होण्याची शक्यता आहे. महापौर राजेंद्र देवळेकर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने प्रथेप्रमाणे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात यावे असा एक सूर आळवला जात असून दुसरीकडे आयोजक गुलाब वझे हेही या पदासाठी उत्सुक आहेत. आगरी समाजाकडे हे पद दिले गेल्यास संमेलनात आणखीनच रंगत येईल अशी चर्चा आगरी समाजामध्ये आहे. संमेलनाचा खर्च, साहित्यिक- लेखक यांची राहण्याची सोय, येण्या-जाण्याचा खर्च, मानधन हा सर्व खर्च खूप मोठा आहे. आगरी युथ फोरम यांच्यावतीने एक ते दीड कोटी निधी जमा होऊ शकतो. ‘कल्याण डोंबिवली शहराला यंदा साहित्य संमेलनाचा मान मिळणार याविषयी आशा असल्याने यापूर्वीच पालिकेने साहित्य संमेलनासाठी ५० लाख निधीची तरतूद करून ठेवली आहे. तेवढी मदत साहित्य संमेलनासाठी संस्थेला देण्यात येईल. गुलाब वझे यांनी सर्वाना विचारात घेऊन एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,’ असे महापौर राजेंद्र देवळेकर म्हणाले. संमेलनाचे नियोजन आम्ही करणार असून, स्वागताध्यक्षपदही आमच्याकडेच असेल, आम्ही लवकरच स्वागताध्यक्षपदी कोण असणार हे जाहीर करू. -गुलाब वझे, आगरी युथ फोरम