ठाणे : हातातील मोबाईल पाडल्याचा जाब विचारल्याने झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांच्या डोक्याच्या मधोमध चाकू भोसकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात जखमी तरुणांवर मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या वादाचे पर्यवसन हत्येच्या प्रयत्नात झाल्याने भिवंडी शहरात खळबळ उडाली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५ (२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोहम्मद शेख आणि इरफान अन्सारी हे दोघे रविवारी रात्री शांतीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राच्या घरी आले होते. त्यावेळी मित्राचा भाऊ दुचाकीवर बसून मोबाईलमध्ये सोशल मिडीया पाहण्यात व्यस्त होता. त्याचवेळी एक तरुण त्याच्या दिशेने आला. त्याने त्याच्या हातावर फटका मारला. या प्रकारामुळे त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि मोबाईलचा डिस्प्ले फुटला. याबाबत त्याने जाब विचारला असता, त्या तरुणाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काहीवेळाने त्याने त्याच्याकडील चाकू बाहेर काढला आणि पुन्हा शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून मोहम्मद शेख आणि इरफान शेख त्याठिकाणी आले. दोघे वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्या तरुणाने इरफान शेख याच्या डोक्याच्या मधोमध चाकून घाव केला. इरफान शेख याला वाचविण्यासाठी मोहम्मद शेख हा आला असता, त्याच्याही डोक्याच्या मधोमध त्या तरुणाने घाव केला. त्यानंतर त्यांच्या मित्राची आई त्यांना वाचविण्यासाठी आली असता, तिच्या हातावर देखील त्या तरुणाने वार केले.

या घटनेत मोहम्मद शेख आणि इरफान शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना भिवंडी येथील आयजीएम या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना पुढील उपचारासाठी आता मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५ (२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. क्षुुल्लक कारणांमुळे असे प्रकार घडत असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. क्षुल्लक वादातून अनेकदा जीव देखील गमवावा लागल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.