बदलापूरः काही वर्षांपूर्वी वालधुनी नदी आणि परिसराच्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाने उल्हासनगर शहरातील जीन्स धुलाई कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य केले. उत्पादन खर्च वाढवणारे प्रकल्प टाकण्याऐवजी या जीन्स धुलाई कंपन्यांच्या मालकांना आपले बस्तान उल्हासनगरातून हलवून थेट ग्रामीण भागाची वाट धरली. यातील काही धुलाई कारखाने आता अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात स्थिरावू लागले आहेत. यात प्रामुख्याने उल्हास नदी किनारी हे कारखाने सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही प्रदुषण वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवलीत धुळीच्या लोटांमुळे प्रवासी, वाहन चालक हैराण

गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले. प्रदूषणाचा हा मुद्दा राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शासकीय यंत्रणांनी प्रदूषण रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या. वालधुनी नदीच्या प्रदूषणात सर्वात मोठा वाटा येथील जीन्स धुलाई कारखान्यांचा होता. त्यामुळे या कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची सक्ती केली. मात्र या जीन्स धुलाई कंपन्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याऐवजी कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षात अंबरनाथ बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात लपून छपून हे जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याचे दिसून आले होते. पाण्याच्या प्रवाहाशेजारी कारखाने सुरू करण्याला जीन्स धुलाई कंपनी मालकांकडून प्राधान्य दिले जाते. याबाबत तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे कारखाने बंद करत असते. मात्र त्यानंतरही अंबरनाथ तालुक्यात जीन्स धुलाई कारखान्याचे जाळे आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात बदलापूर शहराच्या लगतच्या गावांमध्ये जीन्स धुलाई कारखाने थाटल्याचे समोर आले. उल्हास नदीच्या किनारी काही जुलाई कारखाने बिन दिक्कतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. या जीन्स जुलाई कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उल्हासनगर शहरात ज्या पद्धतीने थेट वालधुनी नदीत सांडपाणी सोडले जात होते, तशाच प्रकारे सांडपाणी उल्हास नदीत सोडले जात असल्याची शक्यता व्यक्त होते आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी एम कुकडे यांना विचारले असता माहिती मिळताच जीन्स धुलाई कारखान्यांवर कारवाई केली जाते ग्रामीण भागात असे उद्योग सुरू असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले

कुठे आहेत जीन्स धुलाई कारखाने

अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीकिनारी असलेल्या काराव आणि आसपासची गावे तसेच बारावी नदीपात्राच्या जवळ असलेल्या आंबेशीव, चोण, भोपीपाडा या भागांमध्ये हे जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. विशेष म्हणजे दोन्हीही जलस्त्रोत ठाणे जिल्ह्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा करत असतात. त्यामुळे हे जलस्रोत दूषित होण्याची भीती व्यक्त होते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhas river pollution jeans washing unit in rural areas of badlapur zws
First published on: 06-10-2022 at 17:06 IST