ठाणे : ठाणे, गुजरात आणि मुंबई भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील माजिवाडा उड्डाण पुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम अवकाळी पावसामुळे रखडल्याचे चित्र असतानाच, या पहिल्याच पावसाच मानपाडा आणि माजिवाडा उड्डाण पुलांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांमधून वाहनांना वाट काढावी लागत असून त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.
घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. हि वाहने घोडबंदर मार्गावरून वाहतूक करतात. याशिवाय, हा मार्ग मुंबई आणि गुजरात राज्याला जोडण्यात आलेला आहे. उरण येथील जेएनपीटी बंदर आणि गुजरात अशी वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदर मार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्या मोठी असून या वाहनांना रात्री आणि दुपारच्या वेळेत वाहतूकीस परवानगी आहे. या मार्गावर आणि त्यावरील उड्डाणपुलांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. यामुळे वाहनांचा वेग मंदावून अभुतपुर्व कोंडी होते, हे चित्र दरवर्षी दिसून येते. त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू आहेत.
हा मार्ग एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो तर, त्यावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. असे असले तरी हे रस्ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातून जात असल्याने त्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही दिवसांपुर्वी संबंधित विभागांना पत्र पाठवून पावसाळ्यापुर्वी मार्गाची दुरुस्ती करण्याची सुचना केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने माजिवडा उड्डाण पुलावरील मुंबई मार्गिकेचे काम हाती घेतले. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हे काम थांबले आहे. तर, वाघबीळ, मानपाडा, पातलीपाडा या पुलांच्या दुरुस्तीचे कामही सुरू होऊ शकलेले नाही. माजिवाडा पुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत असून येथे रस्त्यावरील डांबर यंत्राद्वारे खरडून काढण्यात आलेले आहे. त्यावरून दुचाकी चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी आहे. असे असतानाच, या मार्गावर पाहिल्याच पावसात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे मानपाडा पुलावरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहने आदळत असून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
घोडबंदर मार्ग आणि उड्डाण पुलावरील रस्ते दुरुस्तीचे काम एप्रिल महिन्यात हाती घेणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित विभागांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. २० मे पर्यंत मुंबई मार्गिकेचे काम होणार होते. मात्र, ते कामही संथगतीने सुरू होते. त्यातही पाऊस लवकर सुरू झाल्याने रस्ते दुरुस्ती कामे रखडली असून या रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, रस्ते दुरुस्ती काम लवकरच हाती घेण्याचे नियोजन होते. मात्र, मेट्रोचे गर्डर लाॅंचिंगचे काम असल्यामुळे कामे आता सुरू करण्यात आली आणि त्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने ही कामे थांबली. पाऊस थांबताच दुरुस्ती आणि खड्डे भरणीचे काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.