‘प्रभाग’फेरी – उथळसर

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला लागूनच असलेला मोठा परिसर उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात मोडतो. श्रीरंग, आझादनगर, हंसनगर, परेरानगर, कोलबाड, गोकुळदासवाडी, सेंट्रल जेल, महागिरी, साकेत, राबोडी, के-व्हिला आणि वृंदावन या परिसराचा समावेश या भागात होतो. वरवर पाहता हा परिसर मूळ शहरापासून वेगळा काढला जात असला तरी येथील जुन्या ठाण्याच्या समस्यांचे प्रतििबब या भागात पाहायला मिळते. जुन्या ठाण्यातील अरुंद रस्ते, वाहनतळाच्या समस्या, मोकळ्या जागांची वानवा, लगतच असलेल्या उथळसर परिसराला भेडसावणार नाही असे चित्र वर्षांनुवर्षे रंगविले जात असले तरी येथील समस्यांचे स्वरूप पाहता प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असल्याचे पाहायला मिळते.

शिवसेना, भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या परिसरात राबोडीसारखी मुस्लीमबहुल वस्ती असून या भागात मात्र नजीब मुल्ला यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षांनुवर्षे वरचष्मा राखला आहे. मूळ शहरातील वाहतुकीचे हमरस्ते या भागातून जात असल्याने उथळसर प्रभाग समितीला शहरातील वाहतूक नियोजनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. सिडको रोड, साकेत रोड, टेंभीनाका, कोर्ट नाका, सिव्हिल हॉस्पिटल, मीनाताई ठाकरे चौक, एलबीएस मार्ग, गोल्डन डाईज नाका आणि खोपट या प्रमुख रस्त्यावरून वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. मूळ शहराप्रमाणे या भागातील अनेक रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. बेकायदा वसाहती आणि अधिकृत इमारती असा हा परिसर आहे. श्रीरंग आणि वृंदावन भागातील जुन्या इमारती पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून या भागातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही मोठी समस्या आहे.

खोपट, गोकुळदासवाडी, सेंट्रल जेल आणि महागिरी हा परिसर शिवसेनेचा तर राबोडी परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गोकुळदासवाडी भागातील शिवसेनेचे कृष्णा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या भागातील लढती रंगतदार होतील.

पुनर्विकासाचा पेच

ठाण्यातील सर्वात जुनी वसाहत म्हणून श्रीरंग सोसायटी ओळखली जाते. या ठिकाणी एकूण २५ इमारती असून त्या १९६६ मध्ये उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी अनेक इमारती पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे वृंदावन सोसायटीमधील जुन्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे या भागातील ही सर्वात मोठी समस्या आहे.

वाहतूक कोंडीचा मोठा ताप

कापूरबावडी उड्डाण पुलावरील घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका दीड वर्षांपूर्वी खुली करण्यात आली. मात्र, ही मार्गिका पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पुलालगत ऋतुपार्क सोसायटी असल्याने तेथील नागरिकांनी त्या पुलास विरोध केला होता. या विरोधानंतरही हा पूल उभारण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी साऊंड बॅरिअर उभारण्यासाठी नागरिकांना आंदोलन करावे लागले होते. या आंदोलनानंतर पुलावर साऊंड बॅरिअर बसविण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील बहुतेक रस्ते अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सरस्वती शाळा, टेंभीनाका, कोर्ट नाका, साकेत, उथळसर, आंबेडकर रोड, एलबीएस मार्ग, गोल्डन डाईज नाका अशा ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसून येते. अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत आणखी भर पडते. गीता सोसायटीजवळील मार्ग नागरिकांना ओलांडणे शक्य होत नव्हते. दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक आणि या अरुंद रस्त्यावर होणारी दुतर्फा पार्किंग यामुळे या भागात कोंडी होते. ती कमी करण्यासाठी या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली. मात्र, वाहतूक पोलीस त्या ठिकाणी तैनात असतील तरच या बदलांची अंमलबजावणी होते आणि वाहतूक पोलीस नसतील तर दुहेरी वाहतूक सुरू असते. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याचप्रमाणे  परेरानगर, हंसनगर या भागातील रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते.

कचरा समस्या..

उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील अनेक भागांतील रस्त्यांवर कचरा टाकण्यात येत असल्याने त्या ठिकाणी दरुगधी पसरते. वृंदावन सोसाटीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच रस्त्यावरील गटारे उघडी आहेत. त्याच प्रमाणे दर वर्षी गटारे साफ करूनही ऐन पावसाळ्यात मात्र ती तुंबतात, असे नागरिकांकडून सांगण्यात येते.

खोपट परिसर ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. परेरानगर आणि हंसनगर परिसराला लागूनच एसटी बसस्थानक आणि कार्यशाळा आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहनांची वर्दळ दिसून येते. तसेच या भागातील नाल्यामुळे पावसाळ्यात दरुगधी पसरते. पावसाळा आला की नाला साफ केला जातो आणि त्यातून काढलेला कचरा व गाळ रस्त्यावरच टाकला जातो. त्याचप्रमाणे खोपट भागातील रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान बसविले असून त्याकडे महापालिकेचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

सुवर्णा सोमण, रहिवाशी , खोपट

खोपट एस.टी. बस स्थानकापासून ते सिग्नलपर्यंत दोन्ही बाजूंचे पदपथ येथील दुकानादारांनी आणि हॉटेलचालकांनी काबीज केले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक नसल्याने रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र रस्त्यावरील भरधाव वाहनामधून वाट काढावी लागत असून हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.    

– प्रतीक चव्हाण, परेरा नगर.

अनेकदा रस्त्यांवरील फेरीवाले, भाजी विक्रेते मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांवर कचरा टाकतात. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून येते. महापालिकेने फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा द्यावी आणि त्यांच्यासाठी खास दिवसातून दोनदा घंटागाडी पाठविण्यात यावी, जेणेकरून रहिवाशांना स्वच्छ रस्ते उपलब्ध होतील.

– मनोज खाबडे, हंसनगर.

उथळसर प्रभाग समिती क्षेत्र

प्रभाग क्रमांक – १०

आरक्षण – अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब ) सर्वसाधारण महिला

क ) सर्वसाधारण महिला

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५०७२२

प्रभाग क्षेत्र – साकेत, राबोडी, के-व्हीला, वृंदावन

प्रभाग क्रमांक – ११

आरक्षण – अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

ब ) सर्वसाधारण महिला

क ) सर्वसाधारण

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५१९७४

प्रभाग क्षेत्र – श्रीरंग, आझादनगर, हंसनगर, परेरानगर, कोलबाड, गोकुळदारवाडी.

प्रभाग क्रमांक – २२

आरक्षण – अ ) अनुसूचीत जाती

ब ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

क ) सर्वसाधारण महिला

ड ) सर्वसाधारण

लोकसंख्या – ५४३९१

प्रभाग क्षेत्र – सेंट्रल जेल, महागिरी