कल्याण – कल्याण पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या काटेमानिवली भागातील उतारावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दोन डम्पर रस्ता दुभाजकला धडकले असल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. महिन्यातून दोन ते तीन वेळा काटेमानिवलीच्या उतारावर विजयनगर भागात असे अपघात होत असल्याने हा उताराचा भाग समतल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काटेमानिवलीचा भाग हा उंच टेकडी सदृश्य आहे. टेकडीचा काही भाग समतल करून या भागात रस्ता तयार करण्यात आला आहे. या टेकडीचा भाग उताराचा असल्याने आहे त्या उतारावरून रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे काटेमानिवली विजयनगर भागात रस्त्याला उभा चढाव आणि खोल उतार आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहन उतरताना चालकाला अतिशय काटेकोरपणे वाहन उतरावे लागते. वाहन उतरत असताना ब्रेक निकामी झाला तर वाहन उतारावरून घरंगळत समोरील दुकाने, दुभाजकला धडकते. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत असे प्रकार सलग तीनदा घडले आहेत.
मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाचे वाहन या भागातील रस्ता दुभाजकाला धडकले होते. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी एक अवजड डम्पर उतारावरून उतरत असताना रस्ता दुभाजकाला धडकला. ब्रेक निकामी झाला की चालक थेट रस्ता दुभाजकाला धडक देऊन आपली बाजू सुरक्षित करून जीवित हानी टाळतो. पण असा प्रकार एखाद्या चालकाला जमला नाहीतर या भागात मोठी जीवित हानी होईल. हा रस्ता पादचारी, व्यापारी, शाळकरी मुले, पालकांनी नेहमीच गजबजलेला असतो, असे स्थानिकांनी सांगितले. दोन महिन्यापूर्वी याच उतारावरील एक टेम्पो बाजुच्या दुकानात घुसला होता.
काटेमानिवली भागातील हा उताराचा रस्ता समतल करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा आणि या भागात दररोज होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे. पालिका ड कार्यालयासमोरील उताराचा भाग कमी करून तेथे समतल रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी आपण पालिकेकडे पाठपुरावा करणार आहोत, असे शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले. जीवित हानी होण्यापूर्वीच या नियमित अपघातग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. या भागातील उंचवटा भाग काढून टाकण्यात यावा, यासाठी आपणही पालिका आयुक्तांना पत्र देणार आहोत, असे माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले.