ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या महापालिकांसह वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतील टि.टी.सी औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा आज, शुक्रवारपासून पुढील चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. शुक्रवारी औद्योगिक क्षेत्र बंद ठेवण्यात येत असल्यामुळे पाणी बंदचा फटका उद्योजकांना बसणार नसल्याचे चित्र असले तरी महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना मात्र पाणी बंदमुळे टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणून बारवी धरण ओळखले जाते. या धरणातील पाण्याचे वितरण एमआयडीसी जिल्ह्यातील सर्वच शहरांसह औद्योगिक क्षेत्रांना करते. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हा स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्र, डोंबिवली एमआयडीसी, २७ गावे, अंबरनाथ, टिटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे औद्योगिक क्षेत्र, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या शहरांमध्येही एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून हा स्त्रोत महत्वाचा मानला जातो. हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तलावांचा कायपालट? २८ कोटींचा प्रस्ताव तयार एमआयडीसी पाणी वितरण व्यवस्थेतील अनेक जलवाहीन्या जुन्या झाल्या असून त्या फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा घटनांमुळे शहरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. अशा घटना रोखण्यासाठी एमआयडीसीने नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहीन्या कार्यान्वित करण्याचे काम एमआयडीसीने टप्प्याटप्प्याने सुरु केले असून एमआयडीसीकडून अशाचप्रकारचे काम आज, शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शुक्रवार, १२ मे रोजी दुपारी १२ ते शनिवार, १३ मे रोजी दुपारी १२ या कालावधी ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रांसह ठाण्यातील वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतील टि.टी.सी औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसीकडून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे वितरण कळवा, दिवा, मुंब्रा, वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर आणि कोलशेत खालचा गाव या परिसरात करण्यात येते. या भागाचा पाणी पुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.