ठाणे : नाल्याच्या कामात बाधित होत असलेली मुख्य जलवाहीनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे उथळसर आणि नौपाड्यातील काही भागांना होणारा पाणी पुरवठा येत्या सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठाणे येथील राबोडी भागातील के व्हिला नाल्यावरील पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे. त्यामुळे ही जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते मंगळवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ असा २४ तासांसाठी उथळसर आणि नौपाड्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा…वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन, तसेच, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन. के. टी. महाविद्यालय परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूल या भागांचा समावेश आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.