तिसऱ्या, चौथ्या मार्गिका उभारणीची योजना ढिम्म मुंबई : ठाणे, कल्याणपुढील लोकल प्रवास सुकर करण्यासाठी १५ डबा लोकलचा विस्तार करण्याचे मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे स्वप्न धूसर झाले आहे. कल्याण ते कसारा-बदलापूर या तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठीचे काम रखडले असून गेल्या दोन वर्षांत भूसंपादनात अजिबात प्रगती झालेली नाही. कल्याण ते कसारा मार्गिके त ३६ हेक्टरपैकी जेमतेम ४.२० हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. या मार्गिका पूर्ण झाल्याशिवाय कल्याणपुढेही १५ डबा लोकल धावू शकणार नाही. कल्याण ते कसारा कर्जतदरम्यान सध्या दोन मार्गिका असून त्यावरून लोकल गाडय़ा व एक्स्प्रेस धावतात. परंतु या सेवांचे वेळापत्रक दोनच मार्गिकांवरून सुरळीत ठेवताना रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडते. लोकल विस्कळीत झाल्यास पर्यायी मार्गिकाही नसल्याने वेळापत्रक सुरळीत ठेवता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण ते कसारादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पाच वर्षांपूर्वी २०१६मध्ये अर्थसंकल्पात या कामाला मंजुरीही देण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळानेही कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काम हाती घेतले. मात्र, यापुढे काहीही प्रगती झालेली नाही. कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प ६७ किलोमीटरचा आहे. मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिला टप्पा कल्याण ते आसनगाव व दुसरा टप्पा आसनगाव ते कसारा आहे. एकूण मार्गिकेसाठी ३७ हेक्टर भूसंपादन लागणार आहे. यामध्ये ३७ गावे येत असून भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याणधील गावांचा समावेश आहे. परंतु स्थानिकांकडूून होणारा विरोध, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप, न्यायालयीन प्रकरण इत्यादी कारणांमुळे रेल्वेसमोर भूसंपादन करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. कल्याण ते कर्जतमधील पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम बदलापूपर्यंत होणार आहे. या मार्गिके साठी १३.६७ हेक्टर जागा लागणार असून आतापर्यंत एकही भूसंपादन झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. डिसेंबर २०२१ पासून भूसंपादन प्रक्रि या सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठीही साधारण चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. कल्याण-बदलापूर (तिसरी-चौथी मार्गिका) १३.६७ हेक्टर भूसंपादनाची गरज १०.५० हेक्टर जमीन खासगी ४.२० हेक्टर भूसंपादन पूर्ण १३६१ कोटी रुपये एकूण खर्च १५ डबा विस्तारही नाही प्रवाशांचा वाढता भार वाहण्यासाठी सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याणपर्यंत १५ डबा जलद लोकल धावतात. या लोकलच्या दिवसभरात २२ फे ऱ्या होतात. या लोकलगाडय़ा कल्याणपुढे नेण्यासाठी तिसरी व चौथी मार्गिका पूर्ण होणे आवश्यक आहे. या मार्गिका झाल्यास लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही स्वतंत्र मार्गिका मिळेल व लोकल फेऱ्यांची संख्याही वाढवता येईल. मात्र, मूळ प्रकल्पच रखडल्यामुळे लोकल विस्तारही अडकलाआहे.