शहापूर : कसारा येथील वीर तानाजीनगर भागात एका घरामध्ये तरुण-तरुणीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सोमनाथ सोनवणे (२३) आणि सुजाता देशमुख (२१) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणाची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अहमदनगर येथील अकोले भागात सोमनाथ आणि सुजाता राहात होते. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमनाथ व सुजाता यांच्यात प्रेम संबंध होते. दीड महिन्यांपूर्वी दोघेही अकोले सोडून कसारा येथे भाडेतत्त्वावर वास्तव्यास आले होते. उदरनिर्वाहासाठी सोमनाथ हा गवंडीचे काम करत होता. ११ सप्टेंबरला सोमनाथचा मित्र अकोले येथून कसारा येथे आला होता. त्याच्या वास्तव्यासाठी सोमनाथ भाडेतत्त्वावर घर शोधत होता. परंतु घर मिळाले नाही. त्यामुळे मित्राने त्याच्या बॅग सोमनाथच्या घरी ठेवल्या. त्यानंतर तो आसनगाव येथे त्याच्या नातेवाईकांकडे निघून गेला. १२ सप्टेंबरला तो बॅग घेण्यासाठी सोमनाथच्या घरी आला. त्यावेळी घराचे दार आतून बंद होते.

हेही वाचा >>>कळवा रुग्णालयाऐवजी जितो संस्थेला अधिक महत्त्व, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार दरवाजा ठोठावून सोमनाथ दार उघडत नसल्याने त्याने घर मालकाला याची माहिती दिली. घर मालकाने घराची मागील खिडकी उघडली असता, सोमनाथ आणि सुजाता हे पत्ऱ्याखालील लोखंडी खांबाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर घर मालकाने तात्काळ याची माहिती कसारा पोलिसांना दिली. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. तडवी, उपनिरीक्षक एस.बी. जाधव पथकासह दाखल झाले. तसेच घटनेची माहिती दोघांच्या कुटुंबियांना दिली. दोघांचेही मृतदेह अकोले येथे नेल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.