जर एखादा नवरदेव लग्नातून पळून गेला तर सगळेच हैराण होतील. पण कर्नाटकच्या चिकमंगलुरूमध्ये त्याहून हैराण करणारी घटना घडली. लग्नाच्या मंडपातून नवरदेव पळाला, त्यामुळे तरुणीने लग्नात आलेल्या एका पाहुण्या मुलाशीच लग्न केल्याचा अनोखा प्रकार समोर आलाय. गेल्या रविवारी अशोक आणि नवीन या दोन भावांचं लग्न एकाच मंडपात होणार होतं. शनिवारी नवीन आणि त्याची होणारी पत्नी सिंधू लग्नाच्या रितीरिवाजात व्यस्त होते. पण त्यानंतर नवीन अचानक गायब झाला. बँगलोर मिररच्या वृत्तानुसार, नवीनच्या प्रेयसीने त्याला धमकी दिली होती की त्याने लग्न केल्यास सर्व पाहुण्यांसमोर येऊन गोंधळ घालेन. त्यामुळे नवीनने स्वतःच्याच लग्नातून पळ काढला आणि तो थेट प्रेयसीला भेटायला पोहोचला. ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेव गायब झाल्याने सिंधू आणि तिच्या आई-वडिलांना चांगलाच धक्का बसला होता. सिंधूला आवरणं कठीण जात होतं. पण यानंतर सिंधूच्या कुटुंबियांनी तिचं लग्न करण्याचं ठरवलं आणि लग्नाच्या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्येच नवरा शोधण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबियांना पाहुण्यांमध्येच मनाप्रमाणे एक मुलगाही भेटला. BMTC कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रप्पा नावाच्या या पाहुण्यानेही सिंधूसोबत लग्न करण्यास होकार दिला. सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्याने जर मुलीला हे लग्न मान्य असेल तर मी देखील तयार आहे असं सांगितलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या परवानगीने सिंधू आणि चंद्रप्पा यांनी त्याच दिवशी त्याच मंडपात लग्न केलं.