‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये, आनंद महिंद्र यांनी यापुढे गाडीतून प्रवास करताना सीट बेल्ट लावूनच प्रवास करण्याची शपथ घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात ओढवला मृत्यू

सीट बेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा मृत्यू

सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठडय़ाला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येते.

Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली

आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची माहिती समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी यापुढे नेहमी सीट बेल्ट लावणार अशी शपथच घेतली आहे. ते ट्वीट करत म्हणालेत की, “गाडीच्या मागील सीटवर असतानाही मी नेहमी सीट बेल्ट लावण्याचा संकल्प करत आहे. तुम्ही सर्वांनीही ही प्रतिज्ञा घ्या असं मी आवाहन करतो. आपल्या कुटुंबाला आपण हे देणं लागतो”.

हा अपघात कसा झाला यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा गाडी फार वेगात होती असं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. तसेच गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलिसांनी म्हटल्याचं पीटीआयने ट्वीट केलं आहे.

चालकाला चकवा…

तिसरी महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे अपघात झालेलं ठिकाण. मुंबई-अहमदाबाद या सहापदरी महामार्गाचा अजूनही काही भाग चौपदरीच आहे. अपघाताच्या ठिकाणी तीनपदरी रस्ता निमुळता होत पुलावर दुपदरी होतो. परंतु याबाबतचा सूचना फलक लावला नसल्याने चालकाला चकवा देणाऱ्या या रस्त्याचा अंदाज येत नाही. मिस्त्री यांच्या चालकालाही या चकव्याचा अंदाज न आल्याने मोटार पुलाच्या कठड्यावर आदळली, असे सांगण्यात आले.

नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला

मितभाषी असलेल्या मिस्त्री यांच्याकडे २०१२मध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्षपद आले. त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. नावात ‘टाटा’ नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले. त्यांना रतन टाटा यांचे वारस म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, केवळ चार वर्षांच्या कालावधीत मिस्त्री यांना टाटा समूहातून पायउतार व्हावे लागले. पुढे सन्मानासाठी त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला. त्यात त्यांना अपयश आले. त्याआधी ते कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात म्हणजे शापूरजी पालनजी अँड कंपनीत १९९१ मध्येच, म्हणजे वयाच्या २३व्या वर्षी संचालक बनले. तीन वर्षांनी ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाटय़ाने यशाचे शिखर गाठले.

मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळे एक नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला असून उद्योग जगताची अपरिमित अशी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra takes pledge after cyrus mistry death in car accident sgy
First published on: 05-09-2022 at 13:52 IST