जगातील माणूसकी लोप पावत चालली आहे अशी ओरड सर्रास होताना दिसते. मात्र या परिस्थितीतही चांगुलपणावर विश्वास बसेल अशी एक घटना नुकतीच घडली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर एका लहान मुलाच्या धाडसाची गोष्ट शेअर केलीय जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक तरुण मुलगी पाण्याजवळ अतिशय आनंदाने खेळत होती. मात्र काही वेळाने पुन्हा पाण्याकडे पाहिल्यावर ती मुलगी न दिसल्याने त्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट पाण्यात उडी घेतली. ही मुलगी नेमकी कुठे गेली हे माहित नसतानाही तो पोहत गेला आणि अखेर या मुलीचे प्राण त्याने वाचविले. विशेष म्हणजे यावेळी जवळपास १०० हून अधिक जण याठिकाणी उपस्थित होते. मात्र हे लोक एक इंचही हलले नाहीत. या मुलाचे पोहण्याचे औपचारिक शिक्षण झालेले नसताना त्याने अतिशय धाडसाने तिला वाचवले.
याबाबत हा मुलगा म्हणाला, ही मुलगी अचानक कुठे गेली हे कळाले नाही. तरीही मी पाण्यात उडी मारली आणि तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. पाण्याचा वेग अधिक असल्याने मला पोहायला अडचण येत होती. मात्र एकेठिकाणी ती असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी तिला धरुन मी काठावर येण्याचा प्रयत्न करत होतो. एक वेळ अशी आलेली की आम्ही दोघेही बाहेर येऊ शकणार नाही असे मला वाटले. मात्र मी हिंमतीने परिस्थितीशी दोन हात करत बाहेर आलो.
त्याच्या या कृत्याची दखल केंद्र स्तरावर घेण्यात आली आहे. त्याला दिल्ली येथे होणाऱ्या जनरल नॅशनल ब्रेव्हरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार या मुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यामुळे अशाप्रकारे इतक्या लहान वयात दुसऱ्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालणारा हा मुलगा आपल्या सगळ्यांसाठीच आदर्श ठरणारा आहे.