Child Died Due To Water Bottle: ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक वेगवेगळ्या शहरांत जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी ट्रेनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. अनेकदा ट्रेनमधील प्रवासी बेजबाबदारपणे वागतात आणि याचा त्रास दुसऱ्यांना होतो. सध्या अशीच गंभीर घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. या घटनेत एका प्रवाशाच्या चुकीमुळे चिमुकल्याचा जीव गेला आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या…

गुजरातमधील राजकोटमध्ये चालत्या ट्रेनमधून फेकलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे बादल संतोषभाई ठाकूर नावाच्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बादल रेल्वे रुळाजवळ खेळत असताना अचानक बाटली त्याच्यावर जोरात आदळली. तो लगेचच बेशुद्ध झाला आणि त्याला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले.

सोमवारी राजकोटच्या शापर-वेरावळ परिसरात ही घटना घडली. जवळच्या बागेत थोडा वेळ खेळल्यानंतर बादल आणि त्याचा एक मित्र रेल्वे रुळाजवळ गेले. ईदच्या दिवशी त्या मुलाचे सुखाचे क्षण दुःखद झाले जेव्हा पाण्याने भरलेल्या बाटलीने त्याला जोरदार धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला.

बाटली मुलाच्या छातीवर आदळली

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, वेरावळ-वांद्रे टर्मिनस (मुंबई) ट्रेनच्या पहिल्या डब्यातील एका प्रवाशाने वेगाने येणाऱ्या ट्रेनमधून बाटली फेकली. दुर्दैवाने ती त्याच्या बादलच्या छातीवर आदळली आणि त्याचा मृत्यू झाला.

पोलिसात गुन्हा दाखल

देश गुजरातने दिलेल्या वृत्तानुसार, शापर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मुलाचा मृतदेह राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बादल हा त्यांच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाचे मूळ मध्य प्रदेशात होते परंतु ते दोन वर्षांहून अधिक काळ गुजरातमध्ये व्यवसाय करत होते. मृताचे वडील राजकोटमध्ये कापडाचा व्यवसाय करत असल्याचे वृत्त आहे.