दिवाळी हा सण घराघरात आनंद घेऊन येणारा. देशात सर्वत्र मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. घरातील वस्तुंपासून नवीन गाडी घेण्यापर्यंत दिवाळीचा शुभ मुहूर्त निवडला जातो. पण प्रत्येकासाठी सण आनंद घेऊन येणारे असतातच असे नाही. कोणताही सण साजरा करायचं म्हटलं की त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आधी विचार करावा लागतो. खर्चाचे गणित सांभाळण्याचा ताण इतरांपेक्षा शेतकऱ्यांवर जास्त असतो. कारण दिवस – रात्र मेहनत करुन सुद्धा हवे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यातच जर निसर्गाने साथ दिली नाही तर कितीतरी महिन्यांचे कष्ट काही क्षणात वाया जातात. पिकाच्या नुकसानीवर सरकारकडुन मदत मिळेल अशी अपेक्षा असते, पण त्यासाठीही अनेक दिवस वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीमध्ये सण साजरे करायला शेतकऱ्यांकडे पैसे कुठून येणार?

शेतकऱ्यांच्या या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारे एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. हे पत्र एका चिमुकल्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले आहे. घरात आर्थिक चणचण आहे, त्यात सण कसा साजरा करायचा हा प्रश्न या मुलाला पडला आहे. सण साजरा करता यावा यासाठी लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी या मुलाची अपेक्षा आहे. खास वऱ्हाडी भाषेत लिहिलेलं हे भावनिक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये काय लिहलंय पाहा.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

हिंगोलीमध्ये राहणाऱ्या प्रताप कावरखे या सहावीत शिकणाऱ्या मुलाने हे पत्र लिहले आहे. त्याने पत्रात लिहले आहे, ‘माझे बाबा शेती करतात. आपली शेतजमीन कमी आहे असे बाबा म्हणतात. मी बाबांकडे रोज खाऊसाठी हट्ट करतो, तेव्हा बाबा चिडून म्हणतात यावर्षी चांगले सोयाबीनचे पिक वाया गेले, आता शेती विकुन तुला खाऊसाठी १० रूपये देतो. आईने दसऱ्याला पोळ्यासुद्धा नाही केल्या. आई म्हणाली, ‘सोयाबीनचे पिक गेले त्यामुळे रोजचे जेवण बनवायला पैसे नाहीत, बाबा दुसऱ्यांकडे कामाला जातात.’ मी आईला म्हणालो आई तू दिवाळीला पोळ्या कर, तर ती म्हणाली, ‘बँकेत अनुदान आले की पोळ्या करेन.’ साहेब आमच्याकडे सणाला पोळ्याही बनत नाहीत. मी बाबांसोबत भांडलो की आई म्हणते, ‘जवळच्या जयपूर गावातील एका मुलाने त्याच्या शेतकरी वडिलांकडे पैसे मागितले. पैसे न देऊ शकल्याने त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली.’ म्हणून आता मी बाबांकडे पैसे मागत नाही. साहेब अनुदानाचे पैसे लवकर द्या, मग आई दिवाळीला पुरणपोळ्या बनवेल. तुम्हीसुद्धा पुरणपोळ्या खायला आमच्या घरी या.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पत्र वाचून अनेकजण निशब्द झाले आहेत. या चिमुकल्याची भावनिक मागणी वाचून आपल्याकडे असणाऱ्या असंख्य गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची जाणीव होते. हे पत्र सध्या व्हायरल होत असून सरकारने लवकरात लवकर या मुलाची विनंती ऐकून शेतीत नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना अनुदान द्यावे अशी मागणी नेटकरी करत आहेत.