करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आंब्याच्या अनेक प्रजाती विकसित करणारे मँगोमॅन हाजी कलिमुल्ला खान यांनी अंब्याच्या काही नवीन प्रजाती निर्माण केल्यात. विशेष म्हणजे या प्रजातींना करोनायोद्ध्यांची नावं देण्यात आली आहेत. करोनाच्या साथीमध्ये प्राण गमावलेल्या डॉक्टर्स, पोलीस कर्मचारींच्या सन्मानार्थ आंब्यांच्या नव्या प्रजातींना त्यांची नावं देण्यात आली आहे. ७४ कलिमउल्ला खान हे पद्मश्रीचे मानकरी आहेत.
करोना कालावधीमध्ये विकसित केलेल्या नवीन आंब्यांच्या प्रजातीसंदर्भात कलिमउल्ला यांनी एएनआयशी खास चर्चा केली. “करोनाच्या कालावधीमध्ये अनेक डॉक्टरांचा रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झाल्याचं मला समजलं. मात्र या डॉक्टरांनी जगायलं हवं होत असं मला वाटलं. म्हणून मी आंब्यांना त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे लॉकडाउनदरम्यान राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. मी त्यांचं नावही अंब्याच्या एका प्रजातीला दिलं आहे. या प्रजातींमुळे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती हे जनतेच्या कायमच लक्षात राहील. या नावांच्या रुपाने हे करोनायोद्धे आपल्या आठवणींमध्ये सदैव जिवंत राहतील,” असं कलिमउल्ला म्हणाले.
आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावाने आंब्याच्या प्रजाती विकसीत करण्याचं काम कलिमउल्ला मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. देशातील एखाद्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला पाहिजे असं कलिमउल्लांचं मत आहे. “जगात अनेक माणसं आहेत पण प्रत्येकजण जगावेगळं काम करत नाही. मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींची नावं आंब्यांच्या प्रजातींना देतो. त्यामुळे सामान्यांना प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन शिखरं सर केली आहेत. २०१९ साली मोदींच्या शपथविधी सोहळ्याला वेगवेगळ्या देशांचे प्रमुख उपस्थित राहिल्याचं पाहून खूप आनंद झाला होता,” असं कलिमउल्लांनी सांगितलं. त्यांनी मोदींच्या नावाने सर्वातआधी २०१५ मध्ये एका प्रजातीला ‘नमोआम’ असं नाव दिलं होतं. त्यानंतर त्यांनी मोदी आम नावानेही एक प्रजाती विकसित केलेली.
कलिमउल्ला यांना आंब्याच्या नवीन प्रजाती विकसित करण्याची आवड आहे, त्यांनी अनेक प्रजातींना सेलेब्रिटीजची नावे दिली आहेत. त्यात योगी आदित्यनाथ, सोनिया गांधी, अखिलेश यादव, ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर व इतरांचा समावेश आहे. या व्यक्तींना अजरामर करण्यासाठी आपण आंब्याच्या प्रजातींना त्यांची नावे दिली आहेत, असे ते सांगतात. त्यांची आंब्याची बाग मलिहाबाद येथे असून ती पाच एकरात आहे. तेथे शंभर वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड आहे, त्याच्यावर त्यांनी १९८७ मध्ये कलमे करून नवीन प्रजाती तयार केल्या. त्यांनी आंब्याच्या काही प्रजातींना त्यांच्या घरातील व्यक्तींचीही नावे दिली आहेत. कलिमउल्ला यांच्या जादूच्या झाडातून आंब्याच्या तीनशे प्रजाती तयार केल्या आहेत व प्रत्येक फळ वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले.