मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी यूटीएस हे अॅप एक महत्त्वाचे साधन बनले आहे. यातून प्रवाशांना रेल्वेस्थानकावर पोहचण्याआधीच लोकल तिकीट बुक करता येते. पण, अॅपमधील एक गोष्ट अनेक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण रेल्वेने त्यात अद्याप कोणताही बदल केलेला नाही. यानंतर आता पुन्हा एका प्रवाशाने यासंदर्भात पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. वेंकट नावाच्या एका प्रवाशाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) यूटीएस ॲपवरील ठराविक अंतराच्या बंधनामुळे तिकीट बुक करण्यात अडचणी येत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला. लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून उतरल्यानंतर लगेच त्यांना लोकल ट्रेन पकडायची होती, पण यूटीएस ॲपवरून तिकीट बुक करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर असणे आवश्यक असल्यामुळे त्यांना तसे करता आले नाही. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, मी लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून उतरल्यानंतर लगेच मुंबई लोकलमध्ये चढू शकलो नाही, कारण यूटीएस ॲपवरून मला तिकीट बुक करण्यास परवानगी दिली नाही. तसेच QR कोड स्कॅन करण्यासाठी बाहेर जावे लागले असे सांगितले. जेव्हा एसी रूममध्ये बसलेल्या बाबूंना गोष्टी कशा चालतात हे जाणून घ्यायचे नसते तेव्हा असे होते. या पोस्टने आता सोशल मीडियावरील अनेक युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. काहींनी या ॲपच्या सिस्टीमवरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. https://twitter.com/snakeyesV1/status/1770109503255584912?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1770109503255584912%7Ctwgr%5Efe522e0ad9d4cff22a4d0c35aa1060737aa51a8c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatoday.in%2Ftrending-news%2Fstory%2Fpassengers-struggle-with-online-ticketing-system-of-mumbai-local-sparks-debate-2517715-2024-03-21 पोस्टवर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रवाशांनी अॅपचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगितले. कारण तिकीट नसलेले प्रवासी तिकीट तपासनिकास दिसल्यावर घाईघाईने लगेच या अॅपवरून तिकीट बुक करतात. तर इतर युजर्सने म्हटले आहे की, हा नियम रेल्वेच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, ज्यात प्रवाशांकडे स्टेशनच्या तिकीट झोनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिकीट असणे आवश्यक आहे. पण, काही युजर्सनी हे निर्बंध रेल्वेने काढून टाकले पाहिजे असे म्हटले आहे, कारण आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्याला लाईनमध्ये उभं न राहता तिकीट काढायचे असेल तर ते यामुळे शक्य होत नाही. पण, यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला आमच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कमेंट्समध्ये कळवा.