Gujarat Viral Video: गुजरातमध्ये शेतकऱ्यांना खत खरेदी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तासन् तास भल्यामोठ्या रांगेत उभे राहूनही आपला नंबर येत नसल्याने शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. खत घेण्यासाठी रांगेत उभे राहून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: रांगेत उभे राहण्याऐवजी चक्क चप्पल-बुटांचे जोड ठेवले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही बूट आणि चपलांच्या रांगेचा व्हिडीओ शेअर करून गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे.

हा व्हिडीओ कच्छ जिल्ह्यातील रापर तालुक्‍यातील असल्याचे सांगितले जात आहे; ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी खत घेण्यासाठी आले होते. खतासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करण्यात आले; पण कडक उन्हात उभे राहून हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी मग रांगेत स्वत: उभे राहण्याऐवजी तेथे आपल्या चप्पल किंवा बुटाचे जो़ड ठेवले आणि ते सावलीचा आसरा घेत रस्त्यावर बसले. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोकांच्या त्यावर वेगवेगळ्याा प्रतिक्रिया येत आहेत.

राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला खोचक टोला

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले आहे, “ही परिस्थिती देशातील सर्वांत मजबूत राज्य असलेल्या गुजरातमधील आहे; ज्याच्या मॉडेलची देशभरात चर्चा आहे. कच्छ जिल्ह्यातील रापर तहसीलमध्ये खत घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना कडक उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रांगेत नाइलाजाने स्वत:ऐवजी बूट वा चपला ठेवाव्या लागत आहेत आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आयुष्य दुप्पट चांगले करण्यावर बोलत आहे.”

या घटनेवर एका ट्विटर युजरने लिहिलेय, “चप्पलची ही रांग पाहून आश्चर्यचकित होऊ नका. कारण- हे विकसनशील गुजरातचे चित्र आहे; जेथे युरिया हे रासायनिक खत घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना कडक उन्हात खूप वेळ रांगेत उभे राहूनही खत न मिळाल्याने चपलांची रांग लावावी लागली.” आणखी एका युजरने म्हटलेय, “पंतप्रधानांच्या गुजरातच्या विकासाची स्थिती पाहा. कच्छ जिल्ह्यात युरिया खत घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी शूज आणि चपलांची रांग लावावी लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याशिवाय आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ गुजरातच्या डबल इंजिन सरकारने केलेल्या विकासाचा आहे. कच्छ जिल्ह्यातील रापर तहसीलमधील लोकांना युरिया खत घेण्यासाठी कडक उन्हात अनेक तास रांगेत उभे राहूनही खत मिळाले नाही. त्यामुळे बूट आणि चपला रांगेत ठेवाव्या लागल्या.” हाच व्हिडीओ जेडीयूने शेअर करीत गुजरातमधील सरकारवर निशाणा साधताना म्हटलेय- “‘हे गुजरात मॉडेलचे खरे चित्र आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या गुजरातमध्ये शेतकऱ्यांना खत मिळत नाही. कच्छ जिल्ह्यात आपल्या पाळीची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी पायांतील बूट आणि चपला रांगेत ठेवल्या आहेत.”