शिंदे गटातले व्हायरल झालेले नेते म्हणजे शहाजीबापू पाटील. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं होतं तेव्हा शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. तो डायलॉग होता काय झाडी काय डोंगार काय हाटेल.. ओक्के मधे आहे सगळं..तेच शहाजीबापू पाटील आता पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचं कारण आहे त्यांचा बदलेला लुक. बंगळुरूतल्या हॅपिनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यावर शहाजीबापू पाटील यांनी ९ किलो वजन कमी केलं आहे. अधिवेशनादरम्यान शहाजीबापू गायब झाल्याच्या चर्चाहिवाळी अधिवेशनात सुरूवातीचे दोन दिवस शहाजीबापू दिसले. त्यानंतर ते अधिवेशनात दिसलेच नाहीत त्यामुळे ते कुठे गायब झाले अशाही चर्चा रंगल्या. सांगोला या ठिकाणी येऊन सुषमा अंधारे यांनी शहाजीबापूंवर टीकाही केली तरीही शहाजीबापू हे प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आले नव्हते. शहाजीबापू बंगळुरूला होते हे आता त्यांचा नवा लुक समोर आल्याने समजलं आहे. शहाजीबापू पाटील हे त्यांचा मित्र महेश पाटील यांच्यासमवेत बंगळुरूच्या श्री श्री रविशंक यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर ९ दिवसांनी ते समोर आले आहेत. ८ दिवसांमध्ये शहाजीबापूंनी ९ किलो वजन कमी केलं आहे. टीव्ही ९ मराठीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. शहाजीबापूंनी ८ दिवसांत ९ किलो वजन कसं कमी केलं?पहाटे पाच वाजता उठून शहाजीबापू योगा करत होते. रोज दोन तास योगासनं केल्यानंतर उकडलेल्या पालेभाज्या आणि कडधान्यं यांचा नाश्ता करत होते. दुपारी बौद्धिक ऐकत होते. त्यानंतर ध्यान धारणाही करत होते. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि पोळी यांचं पौष्टिक असं शुद्ध शाकाहारी जेवण झालं की सुदर्शन क्रिया आणि व्यायाम. तसंच संध्याकाळी ध्यानधारणा असा शहाजीबापू पाटील यांचा दिवसभराचा कार्यक्रम होता. शहाजीबापूंनी ९ किलो वजन कमी झाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली?नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारीला संध्याकाळी शहाजीबापूंचा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर आज शहाजीबापू बंगळुरूहून सांगोल्यात परतत आहेत. आठ दिवसांच्या या कार्यक्रमामुळे माझं वजन कमी झालं असून आता मला हलकं वाटतं आहे अशी प्रतिक्रिया शहाजीबापूंनी दिली आहे.