कानपूर : न्यूझीलंडविरुद्ध कानपूरला होणाऱ्या पहिल्या कसोटीत भारताच्या संघरचनेत बदलाचा गांभीर्याने विचार केला जात असून, युवा शुभमन गिलला मधल्या फळीत स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून, कर्णधार विराट कोहलीसुद्धा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली उतरणारम भारतीय संघ फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याची शक्यता आहे. के. एल. राहुल मयांक अगरवालच्या साथीने सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळल्यानंतर शुभमनला पाचव्या क्रमांकावर पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. हनुमा विहारीचेही संघात पुनरागमन होऊ शकेल. यष्टिरक्षक ऋषभ पंतला विश्रांती दिल्यामुळे वृद्धिमान साहाला संघात परतण्याची संधी मिळणार आहे. कसोटीतील फिरकीच्या आव्हानासाठी सज्ज -सँटनर कोलकाता : ट्वेन्टी-२० मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतामधील अनुकूल खेळपट्टय़ांवर फिरकीच्या आव्हानासाठी आमचे फिरकी गोलंदाज सज्ज झाले आहेत, असे न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने सांगितले. कसोटी मालिकेच्या दृष्टीने न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० मालिकेत कर्णधार केन विल्यम्सनसह काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असलेली ही दोन कसोटी सामन्यांची मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ‘‘कानपूरला होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे काही उत्तम फिरकी गोलंदाज आहेत,’’ असे सँटनर या वेळी म्हणाला.