भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कचऱ्याची वाहतूक करण्याकरिता नवी २४ वाहने खरेदी केली आहेत. यात सहा वाहने सात टन क्षमतेची तर १८ वाहने ही तीन टन क्षमतेची आहेत. मीरा-भाईंदर शहरातून दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करून तो उत्तन येथील कचराभूमीत नेला जातो. तेथील घनकचरा प्रकल्पावर या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील कचरा गोळा करून तो उत्तन येथे घेऊन जाण्यासाठी कंत्राटदाराकडून ८० वाहने लावण्यात आली आहेत. या वाहनांच्या दररोज सुमारे ११३ फेऱ्या होतात. मात्र सध्या त्यातील अनेक वाहने नादुरुस्त झाली आहेत. तसेच निम्म्यापेक्षा अधिक वाहनांकडे योग्यता प्रमाणपत्रही नाही, असे उघडकीस आले आहे. त्यात कचऱ्याची वाहतूक होत असताना तो कचरा रस्त्यावर पडत असल्याची तक्रार सातत्याने पालिकेकडे करण्यात येत होती.
त्यामुळे पालिकेने २ कोटी खर्चून स्वत:च्या मालकीची २४ वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमधील सहा वाहनांची क्षमता प्रत्येकी सात टन आहे, तर उरलेल्या १८ वाहनांची क्षमता प्रत्येकी तीन टन आहे. गाडय़ांचे पैसे पालिकेने नुकतेच दिलेले असल्यामुळे ती वाहतूक विभागाच्या आवश्यक कागदपत्रांच्या मंजुरीकरिता पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.
अधिक ११७ घंटागाडय़ा
मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या थेट घरातून कचरा गोळा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार यापुढे शहरात साधारण ११७ लहान घंटागाडय़ाह्ण फिरवल्या जाणार आहेत. या गाडय़ा शहरातील सर्व लहान-मोठय़ा इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी परिसरात फिरून कचरा गोळा करणार आहेत. यामुळे भविष्यात कचऱ्याचे पिकअप पॉइंटह्ण हे नष्ट होऊन कचरा साचणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. या गाडय़ा पूर्ण दिवस वेगवेगळय़ा टप्प्यात काम करणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात मोठय़ा गाडय़ा पालिकेच्या ताफ्यात आल्या असून लवकरच या घंटागाडय़ाह्ण देखील येणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली.