वसई:स्ते, गटारे, नालेसफाईचे कामे, पाणी निचरा होण्याचे मार्ग मोकळे करणे, पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, मदत कक्ष तयार करून पावसाळ्यातील आपत्तीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम काम करावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
नुकताच वसईच्या तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यात तहसीलदार डॉ.अविनाश कोष्टी, तलाठी मंडळ अधिकारी, गटविकास अधिकारी, महापालिका, अग्निशमन दल, कोस्टल विभाग, पोलीस, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यात विविध प्रकारच्या घटना समोर येत असतात त्या दृष्टीने प्रत्येक विभागाने सक्रिय राहून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना करण्यात आल्या.
अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेतीचे नुकसान व अन्य नुकसान होण्याची शक्यता असते त्यासाठी तातडीने तलाठी व मंडळअधिकारी यांनी उपस्थित राहून पंचनामे करणे, मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तर आरोग्य विभागाने पुरेसा औषध साठा , रुग्णवाहिका, आरोग्य पथके सज्ज ठेवावीत.
पालिकेने पाणी निचरा होण्याचे मार्ग पावसाळ्यापूर्वी मोकळे करावेत.
तर समुद्र किनारे, धबधबे व अन्य पर्यटनाची ठिकाणे अशा ठिकाणी सूचना फलक लावणे, जीव रक्षक उपलब्ध करणे, धोकादायक ठिकाणी पर्यटन बंदी घालणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महावितरणच्या पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होत असतात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळ्या आधीच विद्युत यंत्रणा सुरळीत करावी अशा सूचना महावितरणला केल्या आहेत.
पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या त्या विभागातील ग्रामसेवक, तलाठी यांनी नागरिकांची योग्य ती व्यवस्था करावी.
महामार्गावर पाणी साचून वाहतूक कोलमडून जाते यासाठी सर्व तेथील नाल्यांची स्वच्छता, रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करून घ्यावीत. अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सूचना दिल्या आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर आपत्ती संबंधित घटना याची माहिती टाकावी व समन्वय साधून कामे मार्गी लावावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यालये न सोडण्याच्या सूचना
वसई तालुका हा सागरी किनाऱ्यापट्टीचा भाग आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.यासाठी आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने कोणत्याही अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडू नका अशा सूचना ही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
बेटावरील ठिकाणी धान्य साठ्याचे नियोजन करावे वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला व पाणजू ही गावे बेटावरील आहेत. जेव्हा वादळी वारे अतिवृष्टी होते तेव्हा या ठिकाणचा संपर्क तुटतो यासाठी त्याठिकाणी तीन महिन्याचे शिधा धान्य साठा आधीच पोचवा अशा सूचना पुरवठा विभागाला या बैठकीत केल्या आहेत.