वसई: विरारच्या अर्नाळ्यात वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणच्या भागात महावितरणचे कर्मचारी सुरक्षा साधनाविनाच दुरुस्तीची कामे करीत असल्याने एकप्रकारे या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. शहराच्या वाढत्या नागरिकरणामुळे शहरात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर अतिभार येऊ लागला आहे. अशावेळी वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचण निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात तर अधिकच वीज समस्या निर्माण होत असतात.वीज समस्या निर्माण झाल्यानंतर त्या दुरुस्तीची कामे शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच  खासगी एजन्सीकडून नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली जातात. 

मात्र वीज दुरुस्तीचे काम करताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा महावितरणचे वीज दुरुस्ती करणारे कर्मचारी सुरक्षा साधनाविनाच दुरुस्तीची कामे करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेषतः पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते अशा वेळी वीज दुरुस्तीचे कामांसाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते अशा वेळी योग्य ती सुरक्षा संसाधने सोबत नसल्याने दुर्घटना घडत आहेत.शुक्रवारी अर्नाळा येथे रोहित्राच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली यात एका वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर पुन्हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुरुस्ती कामे करताना त्यांनी सुरक्षा साधने घातली आहेत किंवा नाही याची वरिष्ठ स्तरावरून पाहणी होत नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देऊन त्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी ही आता जोर धरू लागली आहे.

साधने पुरविली जात असल्याचा दावा

महावितरणकडून वीज दुरुस्ती करणाऱ्या तारतंत्री कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली सुरक्षा संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे त्यात हात मोजे, झुला, सुरक्षा टोपी, यासह इतर सुरक्षा साधने व साहित्य दिली जातात याशिवाय साधनांची हाताळणी, वीज खांबावर चढत असताना घ्यावयाची काळजी, कोण कोणती उपकरणे जवळ असली पाहिजे याची माहिती प्रात्यक्षिका सह दाखवत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे वसईच्या अधीक्षक अभियंता यांनी सांगितले आहे.

नागरिकांमधून संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने नागरिकांमधून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. महावितरणच्या निष्काळजी पणामुळे व प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे अर्नाळा येथील तरुणाचा बळी गेला असल्याचा आरोप काँग्रेसचे समीर वर्तक यांनी केला आहे. वीज वाहिन्या भूमिगत व्हाव्या व येथील वितरण व्यवस्था सुधारणा करावी यासाठी अनेकदा मागणी करतो मात्र राज्यशासन लक्ष देत नसल्याने अशा घटनांना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याचे जॉन परेरा यांनी सांगितले आहे.