वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी आहेत. जयेश घरत (२८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली.

विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे महावितरणच्या रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच्या सुमारास महावितरणच्या वटार विभागाचे चार कर्मचारी दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढले होते. मात्र अचानक पणे वीज प्रवाहित होऊन चौघांना विजेचा धक्का लागला. यात तीन जण बाहेर फेकले गेले तर जयेश घरत हा त्यावरच अडकून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून पंचनामा सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जयेश हा अर्नाळा नवापूर जवळील जांभूळपाडा या भागात राहणारा आहे. याशिवाय टेनिस क्रिकेटमध्येही जयेश हा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता. या घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे अर्नाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

यापूर्वी वसईच्या उमेळमान गावात राहणारा अभिजित लकेश्री (२२) हा तरुण महावितरणामध्ये मागील तारतंत्री (लाईनमन) म्हणून काम करत होता. २८ ऑगस्ट २०२३ रोजी वसई पुर्वेच्या सातिवली येथे विजेच्या खांबावर वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या अभिजीतचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला होता.सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणचा गलथान पणाचा बळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरण निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत. कर्मचाऱ्यांना ही सुरक्षा साधने, विज पुरवठा खंडित झाल्यानंतर योग्य रित्या न साधला जाणारा संवाद अशा विविध कारणांमुळे अशा घटना समोर येत आहे.महावितरण व शासनाच्या गलथानपणा मुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केला आहे.या प्रकरणाची चौकशी करावी व जो यात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी. मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी परेरा यांनी केली आहे.