वसई : भाजपाच्या वसई विरार जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाच्या फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख निर्माण झालेल्या प्रज्ञा पाटील यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली आहे. शनिवारी त्यांची पक्षाच्या वसई विरार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. वसईतील त्या भाजपच्या पहिल्याच महिला जिल्हाध्यक्ष ठरल्या आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी विवांता हॉटेलात झालेल्या राजकीय नाट्याच्या वेळी प्रज्ञा पाटील यांनी एकाकी खिंड लढवून बविआच्या दिग्गजांना रोखून धरले होते. त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती. त्यामुळेच त्यांची निवड झाली असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वसई विरार शहरात सर्वाधिक मताधिक्य मिळवीत भाजपने मोठे यश संपादन केले होते. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुक, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू केली होती. राज्यातील सर्व जिल्ह्यात नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र वसई विरारच्या जिल्हाध्यक्षपद कुणाला मिळणार ते गुलदस्त्यात होते. शनिवारी अखेर भाजपने २२ जिल्हाध्यक्ष पदाची यादी जाहीर केली. यात वसई विरार साठी एका महिला कार्यकर्त्या असलेल्या प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षा म्हणून नियुक्त केली आहे. प्रथमच वसई विरार मध्ये भाजपने महिला नेतृत्वाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.
कोण आहेत प्रज्ञा पाटील?
मागील बारा वर्षांपासून प्रज्ञा पाटील या भाजप पक्षात सक्रिय झाल्या होत्या. यापूर्वी जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस म्हणून आपली जबाबदरी चांगला प्रकारे पार पाडली. त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संघटनात्मक बांधणी व भाजपच्या विविध उपक्रमात ही त्याचा मोठा सहभाग असल्याने त्यांना ही संधी देण्यात आल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.भाजपच्या वरिष्ठांनी विश्वास दाखवून एका विशेष मागास वर्गीय हिंदू सोनकोळी समाजाच्या महिलेला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असे नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी विविध ठिकाणी कार्यक्रमात होते. कार्यक्रमात असताना अचानकपणे माझी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केल्याची बातमी मिळाली त्यामुळे मला फारच आनंद झाला असेही पाटील यांनी सांगितले आहे. नव नियुक्त जिल्हाध्यक्ष झालेल्या प्रज्ञा पाटील यांनी वसई विरार शहरात भाजपच्या संघटनात्मक बांधणी यासह पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे तसेच आगामी येणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा महापालिकेवर फडकवू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
विवांता मधील दिलेल्या एकाकी झुंजीचे बक्षीस
विधानसभा निवडणुकीच्या वेळी विरारच्या हॉटेल विवांता मध्ये नोटा वाटप नाट्य रंगले होते. यावेळी बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी भाजप नेते विनोद तावडे व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बविआ कार्यकर्त्यांनी घेरले होते. त्यावेळी प्रज्ञा पाटील यांनी विरोधकांना एकाकी झुंज दिली. त्या बविआच्या दिग्गज नेत्यांना एकट्याने सामोर्या गेल्या होत्या. अन्यथा भाजपच्या राजन नाईक यांच्यावर हल्ला झाला असता. या घटनेनंतर त्यांची पक्षातील फायरब्रॅंड कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळेच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.