भाईंदर :-उत्तन येथील चौक बंदरावर मासेमारी बोटींच्या तुलनेत उभारण्यात आलेली जेट्टी आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे या जेट्टीचा विस्तार करण्याची मागणी मच्छिमारांकडून सातत्याने केली जात असूनही, शासनाच्या विविध नियमांमुळे हे काम रखडले जात असल्याचे समोर आले आहे.
भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसराला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमार मासेमारीचा व्यवसाय करतात. सध्या येथील समुद्रात सुमारे एक हजार मासेमारी बोटी कार्यरत आहेत. त्यामुळेच शासनाने उत्तन आणि चौक बंदरावर जेट्टीची उभारणी केली होती. या जेट्टीच्या सहाय्याने मच्छिमार बोटी किनाऱ्याला लावून सामानाची ने-आण करतात.मात्र चौक बंदरावर उभारलेली जेट्टी आता जवळपास ३५ वर्षे जुनी झाली आहे. त्यामुळे ती बोटींच्या संख्येच्या तुलनेत अपुरी व कमकुवत ठरू लागली आहे. सध्याच्या जेट्टीचे बांधकामही खालावलेले आहे.
या पार्श्वभूमीवर समुद्रात लांब सुसज्ज जेट्टी उभारण्याची मागणी स्थानिक मच्छिमार अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने १४ जून रोजी मंत्रालयात शासनाच्या मत्स्य विभाग व मच्छिमार प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीदरम्यान, शासन परवानग्यांअभावी जेट्टीचा विस्तार रखडला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मंत्र्यांनी याबाबत तातडीने पाठपुरावा करून जेट्टीच्या विस्ताराच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आदेश मत्स्य विभागाला दिले आहेत.
दुरुस्तीचेही काम रखडले
उत्तनच्या चौक जेट्टीची दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या मत्स्य विभागाने दीड वर्षांपूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा परिसर सीआरझेड अंतर्गत येत असल्यामुळे या कामासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे.गेल्या डिसेंबर महिन्यात संबंधित परवानगी देणाऱ्या समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर अद्याप नव्या समितीची निवड झालेली नाही. परिणामी, जेट्टीच्या दुरुस्तीचे कामही रखडलेले आहे.