भाईंदर :उत्तनच्या किनाऱ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी मच्छीमारांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण करू लागली आहे. विशेषतः वाहतूक कोंडीमुळे मच्छीमारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भाईंदर पश्चिमेला लाभलेला उत्तनचा समुद्रकिनारा येथील नागरिकांसाठी मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणारा आहे. या परिसरात सुमारे ८०० मासेमारी बोटी कार्यरत आहेत. तसेच, परिसरात असलेली नैसर्गिक संपन्नता लक्षात घेता शासनाकडून गोराई आणि वेलेंकनी हे समुद्रकिनारे विकसित करण्यात आले आहेत. परिणामी, या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुट्ट्यांच्या दिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात.
मात्र, वाढत्या पर्यटकांच्या गर्दीचा त्रास आता स्थानिक मच्छीमारांना होऊ लागला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून समुद्रातील मासेमारीवर बंदी लागू होते. या कालावधीत मच्छीमारांकडून सुकी मासळी वाळवणे, जाळ्या विणणे, बोटींची देखभाल व रंगकाम, तसेच घरांची दुरुस्ती यांसारखी कामे केली जातात.परंतु, मच्छीमारांच्या घराबाहेरूनच समुद्रकिनाऱ्यावर जाणारा एकमेव मार्ग असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा फटका विशेषतः संध्याकाळच्या वेळेस अधिक जाणवतो आणि त्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
याशिवाय, पर्यटकांच्या सततच्या वर्दळीमुळे मच्छीमारांचे कामही खोळंबून जात आहेत.त्यामुळे पर्यटकांविषयी कोणताही विरोध नसून शासनाने समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
कालावधी न वाढल्यामुळे मच्छिमार नाराज
पावसाळ्यातील मासेमारीबंदीच्या कालावधीमध्ये १५ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात यावी, या मच्छीमारांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आगामी मासेमारीबंदीच्या कालावधीसंदर्भात नुकतेच आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार १ जून ते ३१ जुलै असा मासेमारीबंदीचा कालावधी आहे. या कालावधीत वाढ न झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.