भाईंदर : उत्तन येथील चौक परिसरात उभारण्यात येत असलेल्या शूरवीर चिमाजी अप्पा स्मारकला तब्बल २० वर्षांनंतर शासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत स्मारकाची उभारणी करून परिसरात सुशोभीकरण करण्याकडे प्रशासनाने लक्ष वळवले आहे.

भाईंदर पश्चिम भागात असलेल्या उत्तन चौक परिसरात चिमाजी अप्पा स्मारक उभारण्यात येणार आहे. चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर विजय प्राप्त केल्यानंतर खाडी पलीकडील मीरा भाईंदरच्या हद्दीतील चौक येथे बुरुज व तटबंदी उभारली होती. इतिहासातील अवशेष आजही या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या परिसरात चिमाजी अप्पांचे स्मारक उभारण्याचे नक्की करण्यात आले होते. त्यामुळे महानगरपालिकेकडून विकास आराखड्यात  ही जागा आरक्षित करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर या परिसरात स्मारकासोबत बगीच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चबुतरा तयार करण्यात आला. मात्र मूळ पुतळ्याला उभारण्याकरिता आवश्यक असलेली  जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी प्रशासनाकडून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे तब्बल वीस वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

त्यामुळे या संदर्भात प्रशासनाने पाठपुरावा करून अखेर वीस वर्षांनंतर आवश्यक असलेली सर्व परवानगी प्राप्त केली आहे. तसेच चिमाजी अप्पाचा पुतळा तयार करण्याचे काम विजय शिरवडकर यांना दिले असून पुतळ्याच्या आराखड्याला मान्यताही मिळाली आहे. त्यानुसार येत्या १७ ऑगस्ट रोजी हा पुतळा पालिकेच्या ताब्यात येणार असून त्या ठिकाणी आधी सुशोभीकरण करण्यात येणार असून नंतर पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे.