वसई: वाहनात लावलेल्या जीपीएस प्रणालीमुळे विरारमधून बेपत्ता झालेल्या चालकाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी भावांना अटक केली आहे. केवळ गावी जाण्यासाठी वाहन हवे असल्याने आरोपींनी चालकाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

विरार येथे राहणारा संतोष झा (४५) हा चालक सुखदेव बोजेवार यांच्या मालकीची गाडी ओला कंपनीसाठी चालवायचा. मात्र १७ जूनपासून तो बेपत्ता होता. दरम्यान त्याचा मृतदेह लोणावळा येथील दरीत सापडला होता. याप्रकरणी विरार पोलीस ठाणे तपास करत होते. ओला कंपनीसाठी लावलेल्या गाडीत असलेली जीपीआर यंत्रणा बंद होती. परंतु मालक बोजेवार यांनी या गाडीत दुसरी स्वतंत्र जीपीएस यंत्रणा बसवली होती आणि त्याची माहिती (ट्रॅक) बोजेवार यांच्या मोबाइलवर येत होती. बोजेवार यांनी आपल्या मोबाइलमध्ये पाहिले असता ही गाडी कोल्हापूरजवळच्या निपाणी येथे आढळली. ज्या ठिकाणी ही गाडी उभी होती तेथे असलेल्या एका हॉटेल चालकाचा नंबर बोजेवार यांनी मिळवला आणि गाडीतील व्यक्तीशी संपर्क केला.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तो क्रमांक युसूफ अला चाऊस (३२) याचा होता. पोलिसांनी त्याचा तांत्रिक साधनांच्या आधारे माग काढला. महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रण (फुटेज), टोलनाक्यावरील चित्रण (फुटेज), त्याच्या मोबाइलचा ठावठिकाणा तपासला आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी माग काढून त्याला आणि त्याचा भाऊ मुस्तकीन चाऊस यांना अटक केली.

क्षुल्लक कारणासाठी हत्या

आरोपी युसूफ अली आणि मुस्तकीन हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ते कांदिवलीच्या दामू नगर येथे राहात होते. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर होते. त्यांना गावी जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळ ओला गाडी बुक करायची आणि चालकाला चाकूचा धाक दाखवून न्यायचे असा त्यांचा बेत होता. मात्र चालक झा याने विरोध केल्याने त्यांनी त्याची हत्या केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.