वसई : मंगळवारी सकाळपासूनच पावसाचे पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. या जोरदार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी वाहून जावे यासाठी नैसर्गिक नाले होते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून पाणी जाण्याचे अनेक मार्ग बंद झाले आहेत.याशिवाय महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्राधिकरणाने जागोजागी करण्यात कलव्हर्ट सुविधा ही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मागील चार दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे महामार्गावरील मालजीपाडा, किनारा हॉटेल, ससूनवघर जवळील जेके टायर समोर, वसई फाटा, सन शाईन हॉटेल समोर, नालासोपारा फाटा,यासह विविध ठिकाणच्या भागात पाणी तुंबून राहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या मुंबई ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वाहने पुढे सरकताना ही अगदी धीम्या गतीने सरकत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.विशेषतः मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर व वसई विरार कडे येणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस तैनात केले आहेत मात्र जागोजागी पाणी साचून राहिल्याने वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू असल्याचे महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.