वसई: मागील काही वर्षांपासून वसई विरार भागात अनधिकृत शाळा उभारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर्षीच्या सर्वेक्षणात वसई तालुक्यात ७१ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. यातील ५८ शाळांच्या विरोधात कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पूर्व पट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात चाळी उभारल्या गेल्या आहेत. अशा विविध ठिकाणच्या भागात मागील काही वर्षांपासून शहरात अनधिकृत शाळा  सुरू करण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील विविध भागांमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत शाळा सुरू आहेत. काही शाळा तर दाटीवाटीच्या परिसरात अनधिकृत बांधकाम असलेल्या खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. तर काही ठिकाणी शाळांना इंग्रजी नावे देऊन त्या शाळा कॉन्व्हेंट असल्याचे भासवून पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाऊ लागली आहे. या अनधिकृत शाळांना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते.

हेही वाचा : ३२७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अंडरवर्ल्डचा सहभाग, दाऊद इब्राहिमचा हस्तक मुख्य सूत्रधार

पेल्हार, मालजीपाडा, दहिसर, कामण,कळंब , विरार  वालीव , बोळींज , माणिकपूर  केंद्रानिहाय केलेल्या सर्वेक्षणात अजूनही शहरात ७१ अनधिकृत शाळा असल्याचे आढळून आले आहे. यातील ५८ शाळांच्या विरोधात शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे दाखल झाल्यानंतर ही शहरात काही शाळा सुरू आहेत.

अनधिकृत शाळांच्या वाढत्या प्रकारामुळे विद्यार्थी व पालक यांची फसवणूक होत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी शहरातील ज्या अधिकृत शाळा आहे व ज्यांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा सर्व शाळांनी मान्यता पत्र शाळेच्या दर्शनी भागात लावा जेणेकरून शाळेची माहिती पालक विद्यार्थ्यांना समजेल अशा सूचना ही शिक्षण विभागाने केल्या आहेत. याशिवाय शिक्षण विभागाकडूनही अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा : विरार रेल्वे स्थानकात थरार, रेल्वे पूलावर महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण व त्यानंतर नियमानुसार कारवाई करण्याचे काम सुरू आहे.पालकांनी सुद्धा ज्या शाळेला शासनाची मान्यता आहे अशा ठिकाणीच मुलांचा प्रवेश घ्यावा.

प्रदीप डोलारे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी वसई.

१) ३४ शाळा अजूनही सुरू

शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांच्या सर्वेक्षणात ७१ शाळा अनधिकृत आढळून आले होते. त्यानंतरही काही शाळांवर गुन्हे दाखल झाले. मात्र त्यानंतरही वसईत ३४ अनधिकृत शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे गुन्हे दाखल होताच काही शाळांनी मान्यता मिळविण्यासाठी धाव घेतली. ४ शाळांना इरादापत्र ही मिळाले आहे.

हेही वाचा : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२) कारवाईमुळे अनधिकृत शाळांचे प्रमाण कमी

मागील तीन ते चार वर्षांपूर्वी वसईत दीडशेहून अधिक अनधिकृत शाळा होत्या. मागील वर्षी ११८ अनधिकृत शाळांची नोंद होती.  अनधिकृत शाळांस बंदच्या नोटिसा बजावून सरसकट गुन्हे दाखल केल्याने अनेक शाळा  बंद झाल्या आहेत असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.यंदाच्या वर्षी ७१ अनधिकृत शाळा आहेत. त्यावर ही कारवाई केली जात आहे.