वसई : वसई-विरार परिसरातील गास, सत्पाळा आणि कळंब या किनारपट्टीवरील सागरी पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेल्या चौक्या कार्यान्वित करण्यात याव्यात अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
वसई तालुक्याला फार मोठ्या सागरी किनारा लाभला आहे सागरी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, येथे होणाऱ्या हालचाली यावर लक्ष ठेवता यावे यासाठी सागरी मार्गावरील कळंब आणि सत्पाळा येथे पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
ही पोलीस अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येते. ते पोलीस ठाणे लांब असल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. ही चौकी उभारल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींचे निवारण करता येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सातत्याने या चौक्या बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
चौक्या बंद असतात त्यामुळे स्थानिक परिसरात बेकायदेशीर हालचाली, समाजविघातक वर्तन, तसेच मद्यधुंद पर्यटकांकडून होणारे गैरवर्तन वाढले आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी सांगितले आहे.
नुकताच भारत व पाकिस्तानमधील सध्याची युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशा विविध प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे. वसई-विरार किनारपट्टी अत्यंत संवेदनशील भाग असून, येथे सागरी पोलीस चौक्यांचे कार्यान्वित असणे आवश्यक आहे यासाठी या चौक्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी परेरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. या चौक्यांमध्ये आवश्यक पोलीस मनुष्यबळ, गस्त यंत्रणा व सुविधाही पुरवण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पोलिसांकडून गस्त सुरूच
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणच्या भागात पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. याशिवाय समुद्र किनार पट्टीवर ही विशेष लक्ष दिले जात आहेत. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्यावर कारवाया केल्या जात आहेत. याशिवाय ज्या चौक्या आहेत त्या सुद्धा सुरूच असतात. मात्र ज्या वेळी पोलीस गस्तीवर जातात तेव्हा बंद असतात असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.