भाईंदर :- मेट्रो कारशेडसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांची एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने चुकीची माहिती दिली असून यात झाडांचे वय व संख्या दिली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पर्यावरण प्रेमींनी आवाज उठल्यानंतर झाडांचे फेर – सर्वेक्षण करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ अंतर्गत, भाईंदरच्या डोंगरी भागात कारशेड उभारण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाने परवानगी दिली असून महापालिकेने बांधकामासाठी परवानेही मंजूर केले आहेत. तथापि, एमएमआरडीएने या कारशेडसाठी सुमारे १२,४०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासंदर्भात महापालिकेने १२ मार्च रोजी जनतेसाठी सूचना प्रसिद्ध केली होती, ज्यावर हजारो नागरिकांनी हरकती नोंदवल्या. या हरकतींची सुनावणी ११ एप्रिल रोजी पार पडली. झाडे तोडू नयेत, यासाठी २१,००० नागरिक आणि अनेक सामाजिक संस्थांनी स्वाक्षरी केलेले पत्र सादर करून तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणी शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी झाडे तोडण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र, शासन निर्णय होण्यापूर्वीच झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आणि प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी असे आढळले की, तोडण्यात आलेल्या झाडांवर सर्वेक्षण क्रमांक नमूद नव्हते.तसेच प्रसिद्ध सूचनेतील माहिती आणि प्रत्यक्ष झाडांचे वय व उंची यात स्पष्ट तफावत होती. त्यामुळे झाडांचे पूर्वी झालेले सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करत, पर्यावरणप्रेमींनी आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्याकडे फेरसर्वेक्षणाची मागणी केली. त्यानुसार, आयुक्तांनी उद्यान विभागाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांना झाडांचे फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या झाडांचे फेर सर्वेक्षण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.