वसई: मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विविध उपक्रम राबविले आहेत. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला असून आयुक्तलयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुक्तालयास १०० पैकी ८४.५७ गुण प्राप्त झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ७ कलमी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम” राबविण्याकरीता निर्देश दिले होते. या सात कलमी कार्यक्रमात कार्यालयातील सोयीसुविधा, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, संकेतस्थळ आदींचा समावेश आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने या अंतर्गत विविध उपक्रम राबवून कार्यालयीन सोयीसुविधा यासह नागरी तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपायोजना आखल्या आहेत. यात आयुक्तलयाचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. याशिवाय त्याचे (CERTIn) यांचे मार्फतीने सायबर ऑडीट केले आहे.
याशिवाय परिमंडळ ०१ मधील सर्व पोलीस ठाणे व कार्यालये यांना आय एस ओ व स्मार्ट प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात आली, जनजागृती विषयी माहिती नागरिकांना मिळावी यासाठी व्हाट्सप चॅनेल, बाल रक्षा अभियान, सायबर गुन्हेगारी बाबत जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. याशिवाय स्वच्छतेच्या दृष्टीने पोलीस ठाणे व कार्यालयात मुदतबाह्य अभिलेख, बेवारस व जुनी वाहने यांची कायदेशिर विल्हेवाट लावून कार्यालयांचा परिसर मोकळा व स्वच्छ केलेला असून तिथे फुलझाडे व कुंड्या लावून सुशोभिकरण केले आहे.
तर दुसरीकडे कार्यालयीन सेवा सुविधांवर आयुक्तालयाने चांगला भर दिला आहे. नागरीकांसाठी स्वच्छ पिणाच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहे, बैठक व्यवस्था, कार्यालयांचे अद्यावत, वर्क फोर्स अँप, पोलीस ठाण्याला आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, ७ वर्षावरील शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळावरुन फॉरेन्सिक दुवे गोळा करण्यासाठी आय बाईक (तपास वाहने) फॉरेन्सिकच्या ३ टीम स्थापन केल्या आहे.आयुक्तालयातील सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरू केली आहे.
स्मार्ट ई-बीट हे मोबाईल अॅपलीकेशन सर्व पोलीस ठाण्यांतील बीटमार्शल यांनी एखाद्या ठिकाणी दिलेली भेट व वेळ याबाबत पर्यवेक्षण करण्याकरीता सुरु केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठीही उपाययोजना आखण्यात आल्या आहे.
या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेने केले होते.नुकताच शासनाने जाहीर केलेल्या निकालात सर्व पोलीस आयुक्तालयातून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन पोलीस आयुक्तालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून आयुक्तालयाला १०० पैकी ८४.५७ गुण मिळाले आहे. आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करता आले असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली आहे. प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आनंद तर आहेत पण केलेल्या कामाचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
नावीन्य पूर्ण उपक्रमावर भर
कृत्रिम बुद्धीमत्ता (ए आय) च्या माध्यमाने आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई. तसेच बॉडी वॉन कॅमेरा वाहतूक पोलीसांच्या कार्यक्षमतेत गुणात्मक व पारदर्शी सुधारणा होण्यासाठी वाहतूक अंमलदारांना कर्तव्यावर असताना बॉडी वॉर्न कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरीकांना त्यांना आलेला अनुभव नोंदविण्याकरीता ई-अभिप्राय सेवा ( क्यू आर कोड बेस) सुरु करण्यात आली असून त्यामध्ये नागरीक सुलभरीत्या त्यांचा अभिप्राय नोंदविता येणार आहे व त्यावर वरिष्ठ अधिकारी देखरेख करतात. असे विवीध नावीन्य पूर्ण उपक्रम ही आयुक्तालयाने सुरू केले आहेत.