भाईंदर :– मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले असताना आता दुसरीकडे भाजपा मधील उत्तर भारतीय कार्यकर्ते देखील नाराज झाले आहेत. राज ठाकरे महायुती मध्ये आल्यामुळे मीरा-भाईंदर पदाधिकारी ४० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला बिनशर्थ पाठिंबा खुद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच रुचलेला नाही. दुसरीकडे मनसे महायुतीचा घटक झाल्यामुळे भाजपातील उत्तर भारतीय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे मीरा-भाईंदर भाजपाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा >>>वसई: बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, एक जण जखमी

राज ठाकरे यांनी सतत उत्तर भारतीयांचा तिरस्कार केला आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. अशा राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेतलेले आम्हाला उचललेले नाही. त्यामुळेच आम्ही भाजपाचा राजीनामा देऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मिरा भाईंदर  उत्तर भारतीय सेलचे माजी जिल्हा मंत्री ब्रिजेश तिवारी यांनी सांगितले

राज ठाकरे यांनी केलेले घाव उत्तर भारतीय विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या सोबत घेणे उत्तर भारतीयांना मान्य नाही. त्यामुळेच नाराज झालेल्या भाजपाच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे असे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खासदार राजन विचारे यांनी सांगितले.