भाईंदर :- वर्सोवा ते विरारसाठी तयार केल्या जाणाऱ्या सागरी सेतू मार्गातील उत्तन ते वसई दरम्यानच्या मार्गात बदल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रस्तावित मार्गांमुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.बृहन्मुंबई महापालिकेने वर्सोवा-दहिसर-भाईंदर असा २२ किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेऊन यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. पालिकेच्या या सागरी किनारा मार्गामुळे वर्सोवा-विरार सागरी सेतूची आवश्यकता उरलेली नाही. यामुळे एकाच परिसरात दोन प्रकल्प होणार असल्याने राज्य सरकारने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करून उत्तन-वसई -विरार असा २४.२५ किमी सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला आहे.या कामाची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवण्यात आली आहे.
प्रामुख्याने हा मार्ग समुद्र किनाऱ्यापासून १ किमी अंतरावर असणार असून यात उत्तन,वसई आणि विरार असे जोड रस्ते दर्शवण्यात आले आहेत.मात्र या मार्गास उत्तनच्या मच्छीमारांनी विरोध दर्शवला आहे.सदर मार्गामुळे मासेमारीचा व्यवसाय पूर्णतः ठप्प होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे मच्छिमारांची ही मागणी परिवहन मंत्र्यांनी देखील मान्य केली असून या मार्गांत बदल करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
मच्छीमारांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न
परिवहन मंत्री प्रसाद नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात, उत्तनच्या मच्छीमारांचे नुकसान टाळण्यासाठी वर्सोवा ते उत्तन आणि त्यानंतर उत्तन ते वसई दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी मार्गामध्ये बदल करून हा मार्ग केवळ वर्सोवा ते दहिसरपर्यंतच आणावा, अशी मागणी केली आहे. तसेच हा मार्ग बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या दहिसर ते भाईंदरदरम्यानच्या सुभाष चंद्र बोस मार्गाशी (६० मीटर रुंदीचा रस्ता) जोडावा. त्यानंतर भाईंदरहून वसई-विरारकडे हा मार्ग नेल्यास शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल आणि मच्छीमारांचेही आर्थिक नुकसान टळेल, असा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. सरनाईक यांच्या या मागणीमुळे उत्तनमधील मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.