भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खबरदारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात घडून जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. मिरा भाईंदर शहरात मागील पाच वर्षांपासून एमएमआरडीएमार्फत मेट्रो उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात दहिसर ते काशिगाव दरम्यानचे काम जवळपास पूर्ण झाले असून, काशिगाव ते भाईंदर पश्चिम दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खबरदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉलसमोर सुरू असलेल्या मेट्रो स्थानकाच्या कामासाठी येथील रस्ता अरुंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही याच मार्गाच्या कडेला क्रेनच्या साहाय्याने साहित्य वर- खाली नेले जात आहे. सध्या दोरीच्या मदतीने ही चढ-उतार होत असल्यामुळे साहित्य कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम करत असताना सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक आहे. मात्र मेट्रोचे कर्मचारी याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी मेट्रोचे काम करत असताना खबरदारी घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिल्या होत्या. मात्र, कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे काही वेळा अपघात घडून मजुरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी एमएमआरडीएची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांमार्फत  कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.